महाबळेश्‍वर, पाचगणी येथील अवैध बांधकामे पाडण्याचे सातारा जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, २५ मार्च (वार्ता.) – महाबळेश्‍वर, पाचगणी या पर्यटन क्षेत्रांमध्ये करण्यात आलेल्या अवैध बांधकामांची वीज आणि पाणी जोडणी तोडावी, तसेच अवैधरित्या बांधण्यात आलेली बांधकामे पाडण्यात यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी महाबळेश्‍वरच्या तहसीलदार सपना चौधरी यांना दिले.

महाबळेश्‍वर, पाचगणी आणि भिलार परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे चालू आहेत. याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले गेले. यामुळे स्थानिक नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटूू लागल्यावर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी याची तात्काळ नोंद घेत जिल्हाधिकार्‍यांनी वरील आदेश दिले आहेत. इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असलेल्या संपूर्ण महाबळेश्‍वर तालुक्यात अवैध बांधकामांच्या ठिकाणी वीज आणि पाणी जोडणी दिली जात आहे, ही गोष्ट अत्यंत गंभीर असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात म्हटले आहे.