हिंदु सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदु धर्माला घातक आहे ! – कालीपुत्र कालीचरण महाराज

पुणे येथील धर्मजागरण सभा

कालीपुत्र कालीचरण महाराज

पुणे – हिंदु मुलींनी इतर धर्मियांशी केलेल्या विवाहांचे परिणाम आपण बघतच आहोत. प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत आहेत. याला आळा घालण्याकरिता हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेमध्ये घुसडला आहे. अशा बेगडी धर्मनिरपेक्षतेला काहीच अर्थ नाही. दुष्ट प्रवृत्तींचा संहार करण्याकरिता देव अवतार घेतो, असे हिंदूंचे तत्त्वज्ञान सांगते. हिंदु सहिष्णू असल्याचा खोटा अपप्रचार हिंदु धर्माला घातक आहे. दुष्टांचे निर्दालन करणे, हेच हिंदु धर्माचे कार्य आहे, असे प्रतिपादन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी केले. ते ‘धर्मजागरण सभे’च्या निमित्ताने पुणे येथे आले असता त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सभेचे आयोजक ‘शिवसमर्थ प्रतिष्ठान’चे संस्थापक दीपक नागपुरे, पुणे शहर भाजपचे प्रवक्ते अली दारुवाला आदी उपस्थित होते.

कालीपुत्र कालीचरण महाराज पुढे म्हणाले की, जात, भाषा, प्रांत अशा वादांमध्ये अडकलेल्या हिंदु समाजाची मोट बांधणे हेच साधूंचे कार्य आहे. समाजाचे हित साधणारा तो साधू, या न्यायाने मी माझे कार्य करत आहे. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी योगी आदित्यनाथ अतिशय प्रभावी काम करत असून देशातील समस्त हिंदूंच्या संघटनांचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्या अंगी आहे. भविष्यात रामराज्य आणण्याचे स्वप्न ते साकार करू शकतात.