हिंदु राष्ट्राच्या संदर्भात संसदेत काहीतरी होणार आहे !

बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे भाकीत !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

छत्तरपूर (मध्यप्रदेश) – ज्या व्यक्तीमध्ये सनातनचे रक्त असेल, ध्येय असेल, तो मनमोकळेपणाने हिंदु राष्ट्राचे समर्थन करील, हिंदु राष्ट्राची मागणी करील आणि हिंदु राष्ट्र स्थापन करील; मात्र ज्याच्या रक्तामध्येच खोट आहे, तो हिंदु राष्ट्राविषयी बोलणार नाही. आम्हाला त्याचे काही वाटत नाही. उलट आम्हाला हेही ठाऊक आहे की, भारत हिंदु राष्ट्र घोषित होणार आहे. हिंदु राष्ट्राच्या निमित्ताने क्रांती होणार आहे. लवकरच या क्रांतीतून संसदेत काहीतरी होणार आहे, असे भाकीत येथील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी त्याच्या दरबारात भाविकांसमोर केले. धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी या वेळी भोपाळच्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या ‘सनातन बोर्डा’च्या स्थापनेच्या मागणीचे समर्थन केले. बागेश्‍वर धाममध्ये १३ ते १९ फेब्रुवारी या काळात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी यज्ञ केला जात आहे.

काँग्रेसचे नेते कमलनाथ हे नुकतेच बागेश्‍वर धाम येथे गेले होते. त्यांनी ‘भारत राज्यघटनेद्वारे चालतो’, असे विधान केले होते. त्याविषयी धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, हिंदु राष्ट्राचे कोण समर्थन करत आहे, कोण विरोध करत आहे, यात आम्ही पडू इच्छित नाही. जे येतील त्यांना धन्यवाद. बागेश्‍वर धामचे सर्वांना आशीर्वाद आहेत.