(म्हणे) ‘मंदिरांमध्ये महिला पुजार्‍यांना अनुमती दिली पाहिजे !’ – नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

डॉ. नीलम गोर्‍हे

नगर – राज्य सरकार ८ मार्च या महिलादिनी नवीन महिला धोरण अमलात आणणार आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी अभ्यास करून मसुदा सरकारकडे दिला पाहिजे, तर शिंगणापूर या ठिकाणी जसे महिलांना चौथर्‍यावर जाऊन पूजा करण्याचा मान मिळतो, त्याप्रमाणे तुळजापूर आणि कोल्हापूर येथील मंदिरांमध्ये पुरुष पुजार्‍यांच्या बरोबरीने महिलांनाही पुजारी म्हणून अनुमती दिली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत केली.

नीलम गोर्‍हे पुढे म्हणाल्या की, महिलांना नोकरी करतांना आरक्षण वयोमर्यादा वाढवून द्यावी, वृद्ध महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, ‘शक्ती’ कायद्याची कार्यवाही करावी. कोरोना काळात अनेक महिला विधवा झाल्या, तर शेतकरी आत्महत्या करत असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे साईबाबा संस्थानने अशा मुलांसाठी शैक्षणिक साहाय्य, निवासी संकुल उभारून त्यांना आर्थिक साहाय्य करण्याची आवश्यकता आहे, अशी काही सूत्रे नव्याने समाविष्ट करण्याच्या लेखी सूचना केल्या आहेत.

  • धर्मशास्त्र काय सांगते ?

  •  महिलांनी पौरोहित्य का करू नये ?

मंत्रोच्चारांमुळे गाभार्‍यात पुष्कळ ऊर्जा निर्माण झालेली असते. त्यामुळे महिलांनी गाभार्‍यात प्रवेश केल्यास त्या ऊर्जेचा महिलांच्या जननेंद्रियांवर परिणाम होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. यासाठी महिलांना गाभार्‍यात जाण्यास मनाई असते; मात्र स्त्रिया मंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेऊ शकतात. अनेक धार्मिक परंपरा या धर्मानेच समाजाच्या कल्याणासाठी घालून दिलेले नियम आहेत. त्यामुळे त्यांचे आजही श्रद्धापूर्वक पालन केले जाते. ते पाळण्यातच आपले हित असते.

संपादकीय भूमिका

धार्मिक क्षेत्रासंदर्भात कोणतेही निर्णय घेतांना सरकारने धर्माचार्यांचे मत घेणे अनिवार्य आहे !