India Slams Pakistan : आतंकवाद निर्माण करणारा पाकिस्तान स्वतःला आतंकवादाचा शिकार म्हणवून घेत आहे !

भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकला सुनावले

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या सचिव अनुपमा सिंह

न्यूयॉर्क (अमेरिका) –  ज्या देशाचा विद्यमान संरक्षणमंत्री उघडपणे आतंकवाद्यांना आश्रय देणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांचा वापर करणे, हे देशाचे अधिकृत धोरण असल्याचे सांगतो, तोच देश आज स्वतःला आतंकवादाचा शिकार म्हणवून घेत आहे. हा एक असा विरोधाभास आहे जो केवळ पाकिस्तानच दाखवू शकतो. हा देश ‘फ्रँकेन्स्टाईन’चे (स्वतःच निर्माण केलेल्या अराजकतेचा फटका बसलेला) जिवंत उदाहरण आहे, म्हणजे ज्याने निर्मिलेली गोष्ट त्याच्याच नाशाला कारणीभूत ठरत आहे’, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले. संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या सचिव अनुपमा सिंह यांनी परिषदेच्या ६२ व्या सत्रात बोलतांना पाकिस्तानचे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले.

या वेळी पाकिस्तान आणि ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या इस्लामी देशांच्या संघटनेकडून जम्मू-काश्मीरसंदर्भात करण्यात आलेले सर्व आरोपही भारताने फेटाळून लावले. अनुपमा सिंह यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून केले जाणारे आरोप तथ्यहीन आणि खोडसाळ आहेत. देशांतर्गत अपयश लपवण्यासाठी आणि आतंकवादाला पाठिंबा देण्यासाठीच पाकिस्तान हा अपप्रचार करत आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो नेहमीच राहील.

६० वर्षे जुना ‘सिंधू जल वाटप करार’ आता कालबाह्य !

पाकिस्तानसमवेतच्या सिंधू जल वाटप करारावर भारताची भूमिका स्पष्ट करतांना अनुपमा सिंह म्हणाल्या की, आतंकवाद आणि सहकार्य एकत्र चालू शकत नाहीत. जो देश आतंकवादाची निर्यात करतो, तोच देश मैत्री आणि सद्भावना यांवर आधारित कराराचे लाभ मागू शकत नाही. आतंकवाद आणि सहकार्य एकत्र चालू शकत नाही. वर्ष १९६० मध्ये झालेला हा करार म्हणजे कायमस्वरूपी मिळालेला अधिकार मानता येणार नाही. गेल्या ६ दशकांत जागतिक परिस्थिती कमालीची पालटली आहे. त्यामुळे कोणताही तांत्रिक करार काळाच्या चौकटीत गोठवून ठेवता येत नाही.