भित्तीपत्रक लावणार्‍या महिला अधिकार्‍याचे स्थानांतर ! – नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त

  • लहान बाळांना गोमांस खाण्याचा सल्ला देणारे भित्तीपत्रक लावल्याचे प्रकरण

  • प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचेही आश्वासन

नवी मुंबई महानगरपालिककेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे 

नवी मुंबई – लहान बाळांना गोमांस खाऊ घालण्याचा सल्ला देणारे भित्तीपत्रक नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात लावण्याचा निष्काळजीपणा करणार्‍या महिला अधिकार्‍याचे स्थानांतर करण्यात आले आहे, अशी माहिती महानगरपालिककेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. ‘या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल’, असेही त्यांनी सांगितले.

१. वाशी येथील रुग्णालयात लहान बाळांना आहारात ‘गोमांस’ खायला द्या’, अशी माहिती असलेले भित्तीपत्रक लावण्यात आले होते. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावूनही दोषी अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यामुळे विश्व हिंदु परिषदेच्या अंतर्गत बजरंग दलाच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्यालयात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

२. नगरसेवक निशांत भगत यांनी लक्ष्यवेधीद्वारे हे सूत्र महानगरपालिकेच्या महासभेतील सभागृहात मांडले. त्यांनी ‘गोमांसभक्षणाचा प्रचार करणारी संस्था आणि उत्तरदायी व्यक्ती यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी केली.

३. हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी महासभेच्या दालनाबाहेर खाली बसून प्रशासनाचा निषेध केला. ‘सरकारी इमारतीत असे फलक लागणे गंभीर आहे’, असे सांगत कार्यकर्त्यांनी याविषयी आयुक्तांकडे तक्रार केल्यावर त्यांनी ‘ही छोटीशी चूक असून हा विषय सोडून द्या’, असा सल्ला दिला. या प्रकरणी आयुक्तांनी क्षमा मागावी, तसेच ‘संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी’, अशी मागणी भगत यांनी केली.

४. सभागृहनेते सागर नाईक यांनी महानगरपालिकेच्या वतीने ‘या प्रकरणी गुन्हा नोंदवावा’, अशी सूचना केली. अपर्णा गवते यांनी त्यांच्या प्रभागात साठेनगर, संजय गांधीनगर येथे गोमांसविक्री होत असल्याचे सांगितले. या प्रकरणी महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना माहिती देऊनही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला.

५. आयुक्त डॉ. कैलास शिंदे म्हणाले, ‘‘मी ही छोटी चूक असून विषय सोडून द्या’, असे वक्तव्य केलेली नाही. शासकीय इमारतीमध्ये असे भित्तीपत्रक लागणे योग्य नाही. सर्वांच्या भावनांचा मी आदर करतो. या विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित संबंधित अधिकार्‍यांचे स्थानांतर केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.’’

संपादकीय भूमिका

केवळ स्थानांतर करून काय होणार ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अशांवर बडतर्फीचीच कारवाई व्हायला हवी !