Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिराच्या दानाची चोरी करणार्‍याच्या ७ पिढ्यांना शाप लागेल !

श्रीराम जन्मभूमी निर्माण समितीचे अध्यक्ष यांचे विधान

नृपेंद्र मिश्रा

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिराच्या दानाची चोरी करणार्‍यांना ७ पिढ्यांपर्यंत शाप लागेल, अशी प्रतिक्रिया ‘श्रीराम जन्मभूमी निर्माण समिती’चे अध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केली. ते एका मुलाखतीत बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, चंपत राय हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कर्तेधर्ते आहेत. चंपत राय यांच्या निष्ठेवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. ते गेल्या ३५ वर्षांपासून मंदिर आंदोलनाशी जोडलेले आहेत; पण देखरेखीमध्ये कमतरता राहिली आहे.

नृपेंद्र मिश्रा यांनी मुलाखतीत मांडलेली सूत्रे

१. यापूर्वी समोर आलेल्या भूमी खरेदी वादापेक्षा दान चोरीचे प्रकरण अधिक गंभीर आणि आव्हानात्मक आहे. भूमी खरेदीची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी ३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. जर व्यवस्थांमध्ये पारदर्शकता नसेल, तर अडचणी निर्माण होऊ शकतात, हे त्या घटनेमुळे लक्षात आले.

२.  व्यवस्थापनाचे २ भाग असतात, निष्ठा आणि देखरेख. पहिला भाग कर्मचार्‍यांच्या निष्ठेवर विश्वास ठेवणे. दुसरा भाग कर्मचार्‍यांवर देखरेख ठेवणे. निष्ठा आणि देखरेख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चंपत राय यांच्यात निष्ठेची नाही, तर देखरेखीमध्ये कमतरता झाली आहे.

३.  देणग्यांमध्ये चोरी कधीपासून होत आहे, याचा अंदाज लावणे कठीण आहे. देणग्यांमध्ये चोरीच्या बातम्यांनंतर वेगळी माहिती गोळा केली. गेल्या ३ वर्षांत प्रतिमहा किती पैसे आले, याची माहिती गोळा केली. कधी ४ कोटी तर कधी १० कोटी रुपयांपेक्षा अधिक  पैसे आले. भक्तांनी दानपेटीत अंगठ्याही टाकल्या. कानातले दागिने आणि सोन्याच्या बांगड्याही दानपेटीत टाकण्यात आल्या. दानपेटीत टाकलेल्या दागिन्यांची पावती नाही.

४. दानांविषयी पुष्कळ पारदर्शकता ठेवली पाहिजे. प्रतिदिनच्या हिशोबाचा लेखाजोखा संकेतस्थळावर यायला हवा. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लिहिले आहे की, खिसे नसलेले कपडे घालावेत. प्रवेश करतांना आणि बाहेर पडतांना पूर्ण तपासणी झाली पाहिजे. अशी चर्चा आहे की, लोक खिशात नोटांची बंडले घेऊन बाहेर पडले. दिशा-निर्देश चांगले आहेत, कार्यवाहीत कमतरता राहिली.