Raichur Muharram Banned : कर्नाटकातील रायचुरू जिल्ह्यातील २९ गावांमध्ये मोहरम सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर बंदी !

  • जिल्हाधिकारी पूविता एस्. यांचा धडाडीचा निर्णय

  • गेल्या वर्षांमध्ये मोहरमच्या कालावधीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने घेतला निर्णय

मोहरम सार्वजनिकरित्या साजरा करण्यास बंदी

रायचुरू (कर्नाटक) – कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने रायचुरू जिल्ह्यातील २९ गावांमध्ये मोहरम सण सार्वजनिकरित्या साजरा करण्यास आणि मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी पूविता एस्. यांनी ‘कर्नाटक पोलीस कायदा १९६३’च्या कलम ३५ अन्वये हा आदेश दिला.

यासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पूविता एस्. यांच्याशी संपर्क साधून या निर्णयासंदर्भात जाणून घेतले. यावर त्या म्हणाल्या की, या २९ गावांत अशा प्रकारच्या मिरवणुकीच्या वेळी कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले होते. त्यासंदर्भातील अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर ‘अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारे काँग्रेसचे सरकार राज्यात असतांना आपण हा निर्णय कसा घेतला ?’, असे विचारले असता, त्या म्हणाल्या की, हा पूर्णत: प्रशासकीय निर्णय आहे. याला कोणत्याही राजकीय दृष्टीने पाहिले जाऊ नये.

रायचुरूच्या जिल्हाधिकारी पूविता एस्.

बंदीचा कालावधी !

१७ ते २६ जून या कालावधीत मुसलमान हा सण साजरा करत असल्याने या गावांमध्ये त्याच्या सार्वजनिक साजर्‍या करण्यावर बंदी असणार आहे.

रायचुरूतील या जिल्ह्यांमधील २९ गावांवर असणार बंदी !

जिल्ह्यातील सिंधनूर, मानवी, सिरवार, देवदुर्ग आणि मस्की तालुक्यांतील विविध गावांमध्ये कायदा अन् सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हा बंदी आदेश काढण्यात आला आहे.

या २९ गावांमध्ये असेल बंदी !

१. सिंधनूर पोलीस ठाण्याच्या सीमेतील : गिणीवार आणि उप्पळ

२. तुर्विहाळ पोलीस ठाण्याच्या सीमेतील : निडीगोळ-तिडीगोळ, हत्तिगुड्डा, कुरकुंदा आणि चिक्कबर्गी

३. बलगानूरु पोलीस ठाण्याच्या सीमेतील : उद्बळ (यू) आणि रागालपर्वी

४. मानवी पोलीस ठाण्याच्या सीमेतील : नंदीहाळ, जानेकल, मदलापुरू, जागीर पन्नुरू आणि मल्लिन मडगू

५. सिरवार पोलीस ठाण्याच्या सीमेतील : सिरवार शहर, तसेच कडदिन्नी आणि बोम्मानाळ

६. कविताळ पोलीस ठाण्याच्या सीमेतील : कविताळ शहर, तसेच हिरेबादरादिन्नी, बागलवाड, अमीनगड आणि गूगेबाळ

७. मस्की पोलीस ठाण्याच्या सीमेतील : तलेखान, संतेकल्लोर आणि मुसली कारलकुंटे

८. जालाहळ्ळी पोलीस ठाण्याच्या सीमेतील : चिंचोडी

९. गब्बूरु पोलीस ठाण्याच्या सीमेतील : खानापूर, बुद्धीन्नी, रामदुर्ग आणि हिरेबूदूर

 ‘कर्नाटक पोलीस कायदा १९६३’चे कलम ३५ काय सांगते ?

या कलमाच्या अंतर्गत ‘सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षा’ राखण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. हे कलम सार्वजनिक मिरवणुकीवर पूर्णपणे बंदी घालत नाही; तर त्यांचे नियंत्रण करणे, निर्बंध घालणे किंवा आवश्यकता भासल्यास त्यावर बंदी घालण्याचा अधिकार पोलिसांना देते.

कायद्याचे उल्लंघन केल्यास काय होते ?

जर पोलिसांनी घातलेल्या नियमांचे किंवा बंदीचे उल्लंघन करून मिरवणूक काढली, तर पोलीस कायद्यानुसार कारवाई करू शकतात, गर्दी पांगवू शकतात आणि आयोजकांवर कायदेशीर कारवाई (दंड किंवा अटक) करू शकतात.

संपादकीय भूमिका

  • राज्यात मुसलमानांचे लांगूलचालन करणारे काँग्रेसचे सरकार असतांनाही एका जिल्ह्यात अशा प्रकारे निर्णय घेतले जाणे, यासाठी तेथील जिल्हा प्रशासन अभिनंदनास पात्र आहे. पूविता एस्. यांच्यासारखे जिल्हाधिकारी सर्वत्र हवेत !
  • हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी अशा प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कधीच निर्माण होत नाही, हे जाणा !