इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपचे आमदार राहुल आवाडे यांसह अन्य

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन, तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांविषयी राज्यशासन सकारात्मक आहे. पाणी साठवणीची क्षमता वाढवण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीस शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपचे आमदार राहुल आवाडे, इचलकरंजीचे महापौर, उपमहापौर, जलसंपदा विभागाचे आणि ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत इचलकरंजी शहराची वाढती पाणी आवश्यकता, कृष्णा नदीवरील उपलब्ध जलस्रोत, तसेच तालुक्यातील गावांच्या पाणीपुरवठ्याविषयी खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुल आवाडे यांनी सादरीकरण केले. या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘कृष्णा नदी ही ३ राज्यांना पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची नदी आहे. कोणत्याही राज्याची हानी न करता संबंधित भागाला आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पाणी साठवण क्षमता वाढवण्याचे विविध पर्याय अधिकार्‍यांनी पडताळून पहावेत. या अभ्यासानंतर तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक गोष्टींचा आढावा घेऊन शासनाकडून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.’’