अन्न सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्याने पुणे विद्यापिठाच्या खानावळीचा परवाना रहित

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ आणि  ‘एफ्.डी.ए.’चे आयुक्त तुकाराम मुंढे 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परिसरातील मध्यवर्ती भोजनगृह (रेफेक्टरी) चालवणार्‍या ‘मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस’चा अन्न परवाना, अन्न व औषध प्रशासनाने (‘एफ्.डी.ए.’ने) निलंबित केला आहे. अन्न सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने १६ जूनला ‘एफ्.डी.ए.’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली. या वेळी अनेक गंभीर अनियमितता निदर्शनास आल्या असून या त्रुटींमुळे अन्न सुरक्षिततेस बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे अधिकार्‍यांनी नमूद केले आहे.

पडताळणीच्या वेळी प्रामुख्याने अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण आणि कीटक प्रतिबंधक उपाययोजनांचा मोठा अभाव दिसून आला. अन्न हाताळणीत अस्वच्छता असून कच्चे आणि शिजवलेले अन्न योग्य प्रकारे वेगळे ठेवलेले नाही, तसेच पाण्याच्या गुणवत्तेचे आणि कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय पडताळणीचे कोणतेही आवश्यक अभिलेख (रेकॉर्ड) उपलब्ध नसून अपुर्‍या स्वच्छतेमुळे कीटक नियंत्रणातही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.

संपादकीय भूमिका

  • केवळ परवाना रहित करून न थांबता विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका पोचवणार्‍यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
  • विद्यापीठ प्रशासनाने या खानावळींवर नियमित आणि कडक देखरेख का ठेवली नाही ? याचे उत्तरदायित्व कुणावर होते, हे पाहून संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे !