लखनौचे लवकरच नामांतर होणार !

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांची घोषणा !

उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक

भदोही (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी राज्याची राजधानी लखनौचे नामांतर करण्याविषयी विधान केले आहे. येथे पत्रकारांशी बोलतांना पाठक म्हणाले की, लखनौविषयी सर्वांना ठाऊक आहे की, ते लक्ष्मणाचे शहर आहे. त्यामुळे सरकार लवकरच या शहराचे नामांतर करणार आहे.

भाजपचे खासदार संगम गुप्ता यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लखनौचे नाव पालटण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. गुप्ता यांनी म्हटले की, लखनौ हे त्रेतायुगात भगवान राम यांनी त्यांचा भाऊ लक्ष्मण यांना भेट म्हणून दिले होते; म्हणूनच हे शहर ‘लखनपूर’ किंवा ‘लक्ष्मणपूर’ म्हणून ओळखले जात होते. १८ व्या शतकात नवाब असफ-उद-दौला याने ते नाव पालटून ‘लखनौ’ असे केले होते.

हैदराबादचे भाग्यनगर करण्याचीही होत आहे मागणी !

तेलंगाणाची राजधानी हैदराबादचे नाव पालटून भाग्यनगर करण्याची मागणीही गेल्या काही वर्षांपासून होत आहे. जुलै २०२२ मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगाणाच्या राजधानीचा ‘भाग्यनगर’ असा उल्लेख केला होता.