पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात कायदे करावेत ! – प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद

हिंदु लोकांना मोर्चे काढण्याची आवश्यकता नसल्याचे प्रतिपादन

डावीकडून डॉ. प्रवीण तोगाडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

नागपूर – खरेतर धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सत्तेत बसलेल्या आणि हिंदु म्हणवून घेणार्‍या लोकांना मोर्चे काढण्याची आवश्यकता काय ? त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या विरोधात कायदा बनवावा, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. गेल्या काही दिवसांत देशभरात हिंदु संघटनांच्या वतीने धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात राज्यातील अनेक शहरांत मोर्चे काढले जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

प्रवीण तोगाडिया म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवला पाहिजे. अयोध्या येथे श्रीराममंदिर उभारले जात आहे, ही आनंदाची गोष्ट आहे; मात्र देशातील लोकसंख्येचे असंतुलन न रोखल्यास ५० वर्षांनंतर थेट अयोध्या येथील श्रीराममंदिराला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा तातडीने व्हायला हवा. केंद्रातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ वर्षभरात संपत आहे. त्या आधी हा कायदा होईल, असा विश्‍वास आहे. काशी आणि मथुरा मंदिर निर्माण होण्यासाठी कायदा, तसेच ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदाही अस्तित्वात आणावा.’’

श्रीराममंदिरासाठी नेतृत्व करणार्‍यांना भारतरत्न द्या !

ते म्हणाले, ‘‘ज्या देशात धर्मासाठी काम करणारे लोक सन्मानित होत नाहीत, त्या देशाचे कधीच कल्याण होत नसते. श्रीराममंदिरासाठी कारसेवकांचे नेतृत्व करणारे अशोक सिंघल, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, गोरख पीठाधीश्‍वर महंत अवैद्यनाथ, अयोध्या येथील रामचंद्र परमहंस आणि कोठारी बंधू या सर्वांना भारताने केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करायला हवे.’’