श्रीराम मूर्तीसाठी आणलेल्या शाळिग्राम शिळेच्या मार्गावरील गावातून पी.एफ्.आय.च्या ८ कार्यकर्त्यांना अटक

पाटलीपुत्र (बिहार) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील कुआनवा गावात धाड टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक केली. यात रियाझ मारूफ याचाही समावेश आहे. राज्यातील फुलवारी शरीफ येथे त्याने पी.एफ्.आय.साठी प्रशिक्षण केंद्र चालवले होते. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्रीराममंदिरासाठी बनवण्यात येणार्‍या मूर्तीसाठी नेपाळमधून ज्या शाळिग्राम शिळा आणण्यात आल्या, त्या याच गावातून प्रवास करत आल्या होत्या. यापूर्वीच श्रीराममंदिरावर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली असल्याने पकडलेल्या या कार्यकर्त्यांकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे.

पी.एफ्.आय.ने वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचा लक्ष्य ठेवले होते, त्याची माहिती फुलवारी शरीफ येथे घातलेल्या धाडीतच मिळाली होती. त्या वेळी श्रीराममंदिराच्या जागी पुन्हा मशीद बांधण्याचाही उल्लेख करण्यात आल्याचे उघड झाले होते.