अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठवणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

नागपूर – अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याविषयी शासन सकारात्मक आहे. जिल्ह्याची माहिती आल्यानंतर केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी २८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिली. अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते.

या वेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अहमदनगरच्या नामांतरासाठी विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना परिपूर्ण प्रस्ताव आणि माहिती पाठवण्यास कळवले आहे. शिवाय अहमदनगर महापालिका, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, टपाल कार्यालय, तहसीलदार यांच्याकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याविषयी कळवण्यात आले आहे. सर्व परिपूर्ण माहिती आल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.