साधकांनो, वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील लढ्याचा अंतिम टप्पा चालू असल्याने भगवंतावरील श्रद्धा वाढवा आणि श्रद्धेच्या बळावर सूक्ष्मातील लढ्याला धैर्याने सामोरे जा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘सध्या सूक्ष्मातील लढ्याचा अंतिम टप्पा चालू असून ६ व्या आणि ७ व्या पाताळांतील वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढा चालू आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी त्रासाचे प्रमाण वाढले असून बर्‍याच साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास वाढले आहेत. पूर्णवेळ साधना करणार्‍या काही साधकांच्या मनात ‘पुढील शिक्षण घ्यावे, नोकरी करावी किंवा सांसारिक जीवन उपभोगावे’, असे विचार येत आहेत. ‘नामजपादी उपाय केल्यावर हे विचार उणावतात’, असे लक्षात आले.

अनिष्ट शक्तींच्या लढ्याचा हा अंतिम टप्पा असल्याने त्या सर्व बळ एकवटून सूक्ष्मातून सतत आक्रमणे करत आहेत. ईश्वरी राज्याच्या स्थापनेत सहभागी असलेल्या साधकांना अधिकाधिक त्रास देऊन त्या त्यांना साधनेपासून परावृत्त करत आहेत. अनिष्ट शक्तींचा जोर अधिक असला, तरी ईश्वरच रक्षणकर्ता असल्याने साधकांनी खचून जाऊ नये. ईश्वरावर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून नामजपादी उपाय करून स्वत:ची साधना वाढवावी ! अनुकूल काळात केलेल्या साधनेपेक्षा प्रतिकूल काळात केलेल्या साधनेचे फळ कैक पटींनी अधिक मिळते. त्यामुळे साधकांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय गांभीर्याने करण्यासह साधनेचे प्रयत्न वाढवण्याकडे विशेष लक्ष द्यावे.

‘साधकांनो, श्रद्धेमुळेच प्रतिकूल काळाला धैर्याने सामोरे जाण्याचे बळ मिळत असल्याने भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवून साधनारत रहा ! ’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.