येत्या ४८ घंट्यात महाराष्ट्र-कर्नाटकातील तणावपूर्ण वातावरण निवळेल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई – आज झालेल्या घटनेच्या संदर्भात मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. आजच्या घटनेच्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे नाराजीही व्यक्त केली आहे. या घटनेच्या संदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला कारवाईचे आश्वासन दिले असून कुणालाही क्षमा करणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. या विषयाच्या संदर्भात मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलणार असून येत्या ४८ घंट्यात महाराष्ट्र-कर्नाटकातील तणावपूर्ण वातावरण निवळेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘अशा प्रकारे राज्याराज्यांमध्ये मतभेद निर्माण होणारे वातावरण सिद्ध होणे योग्य नाही. राज्य घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आपण कोणत्याही राज्यात जाऊ शकतो, देशात कुठेही प्रवास करू शकतो, असे आहे. देशात न्यायप्रियेसाठी महाराष्ट्र राज्य ओळखले जाते. महाराष्ट्रात नेहमीच कायद्याचे राज्य राहिलेले आहे. त्यामुळे कर्नाटकात कुणीतरी कृती केली; म्हणून त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्रात कुणीही तशी कृती करू नये, असे आवाहन मी करत आहे. सर्वाेच्च न्यायालयात सीमा वादावर सुनावणी चालू असतांना कर्नाटक सरकाने चिथावणी देणारी वक्तव्ये करणे योग्य नाही. या प्रकरणी मी केंद्रीय गृहमंत्र्यांशी सविस्तर बोलणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कर्नाकटात जाण्याची वेळ येणार नाही.’’