बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षित आजी (वय ९० वर्ष) यांच्‍या संतसोहळ्‍याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१७.११.२०२० या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एका भावसत्संगात बेळगाव येथील आणि सध्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सनातनच्या साधिका सौ. अंजली कणंगलेकर यांच्या मातोश्री श्रीमती विजया दीक्षितआजी (वय ९० वर्षे) यांनी व्यष्टी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केले. या कार्यक्रमाचे देवाने माझ्याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

पू. (श्रीमती) विजया दीक्षित

१. कार्यक्रमाच्या आरंभापासूनच वातावरणात शांती जाणवणे

कार्यकारणभाव : पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी या शिवदशेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये ईश्वराचे निर्गुण चैतन्य कार्यरत झाले होते. या निर्गुण चैतन्यामुळे त्यांच्या सहवासात शांतीची अनुभूती आली.

२. कु. प्रार्थना पाठक (वय १० वर्षे) हिने घेतलेल्या भावप्रयोगाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवणे

कार्यकारणभाव : कार्यक्रमाच्या आरंभी कु. प्रार्थना पाठक (वष १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत जाण्याचा भावप्रयोग अत्यंत भावपूर्णरित्या घेतला. तेव्हा वातावरणात भाव आणि चैतन्य यांच्या लहरी पसरून सभोवतालचे वातावरण वैकुंठाप्रमाणे झाले आणि सर्वांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व सूक्ष्मातून जाणवले.

कु. मधुरा भोसले

३. भावसत्संगाला आरंभ झाल्यावर सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्याकडून पिवळसर, गुलाबी आणि निळसर रंगाच्या प्रभावळी वायूमंडलात प्रक्षेपित होणे

कार्यकारणभाव : भावसत्संगाला आरंभ झाल्यावर कार्यक्रमाला उपस्थित असणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्याकडून चैतन्याची पिवळी, प्रीती आणि आनंद यांची गुलाबी अन् भक्तीची निळसर रंगाची प्रकाश वलये वातावरणात प्रक्षेपित होतांना दिसली. त्यामुळे वातावरणाची पुष्कळ प्रमाणात शुद्धी झाली.

४. भावसत्संगाच्या ठिकाणी ठेवलेले श्रीकृष्णाचे चित्र कधी तारक, तर कधी मारक रूपात कार्यरत असल्याचे जाणवणे

कार्यकारणभाव : जेव्हा पाताळातील अनिष्ट शक्ती भावसत्संगात अडथळे आणण्यासाठी भावसत्संगाच्या ठिकाणी सूक्ष्मातून आक्रमणे करत होत्या, तेव्हा श्रीकृष्णाने मारक रूप धारण करून त्याची मारक शक्ती पाताळाच्या दिशेने प्रक्षेपित करून अनिष्ट शक्तींशी सूक्ष्म युद्ध केले. जेव्हा पू. आजींच्या अंत:करणातील भक्तीभावाची तरंगे वातावरणात पसरत होती, तेव्हा श्रीकृष्णाचे तारक तत्त्व जागृत होऊन त्याची तारक शक्ती वायूमंडलात पसरली आणि वायूमंडलाची शुद्धी झाली.

५. पू. आजी त्यांचा साधना प्रवास सांगत असतांना साधकांना पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवणे

कार्यकारणभाव : पू. आजी संपूर्ण आयुष्यात परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागल्या. त्यामुळे त्यांचा मनोलय झाला आणि त्या जीवात्मा-शिवदशा अनुभवत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींचे वायूमंडलात प्रक्षेपण झाले.

६. पू. आजी अनुभूती सांगत असतांना प्रेक्षक साधकांचा भाव जागृत होणे

कार्यकारणभाव : पू. आजींच्या हृदयात श्रीकृष्णाप्रती गोपीभाव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले अन् यजमान (कै.) पू. नीलकंठ दीक्षित यांच्याप्रती शिष्यभाव आहे. त्यांच्या हृदयातून ही भावतरंगे वातावरणात प्रक्षेपित झाल्यामुळे प्रेक्षक साधकांचा भाव जागृत झाला.

७. पू. आजी त्यांचा साधनाप्रवास आणि अनुभूती सांगत असतांना त्यांना विस्मरण होणे अन् काही वेळाने स्मरण झाल्यावर त्यांनी सूत्रे सांगणे

कार्यकारणभाव : पू. आजी संत असल्यामुळे जेव्हा त्या शिवदशेत होत्या, तेव्हा त्या देहातीत अवस्था अनुभवत होत्या. त्यामुळे त्यांना स्वत:चा देह, देहाने केलेली साधना आणि साधनेशी संबंधित स्मृती यांचा विसर पडत होता. जेव्हा त्या जीवात्मादशेत येत होत्या, तेव्हा त्यांना वरील सूत्रांचे स्मरण होऊन त्या बोलत होत्या. संत कशाप्रकारे जीवात्मा-शिवदशा अनुभवत असतात, हे मला यातून शिकायला मिळाले.

८. पू. आजींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर लिहिलेली कविता वाचत असतांना सर्वांची भावजागृती होणे आणि वातावरणात चैतन्य पसरणे

पू. आजींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर लिहिलेली कविता पुढे दिली आहे.

दिव्य आशिष

मिल गया लाख मोल का ।
मुझे आशिष गुरुदेव का ।। धृ. ।।

कभी सुनते मेरे कान ।
गुरुदेव की अमृत बैन (१)।
मुझे ध्यास (२) लग गयो उनके नाम का ।
मुझे आशिष गुरुदेव का ।। १ ।।

जब भी मिटती मेरी पलकें ।
वो हौले से (३) मुझ से बोले ।
मुझे प्रेम दिव्य चरणों का
मुझे आशिष गुरुदेव का ।। २ ।।

मेरे मन में छवि गुरुदेव की ।
पंचारती करूं प्राणों की ।
ध्यान एक गुरुचरणन का ।
मुझे आशिष गुरुदेव का ।
मुझे आशिष गुरुदेव का ।। ३ ।।

अर्थ

१. बैन : बोली – बोलणे

२. ध्यास : लगन – उत्कट इच्छा, तळमळ

३. हौले से : धीरे से – हळुवारपणे

– श्रीमती विजया नीलकंठ दीक्षित, बेळगांव (१४.११.२०२१)

कार्यकारणभाव : जेव्हा पू. आजींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर केलेली कविता वाचली, तेव्हा त्यांच्या ठिकाणी मला श्वेत रंगाची साडी परिधान केलेल्या सरस्वतीदेवीचे दर्शन झाले आणि साक्षात् सरस्वतीदेवीनेच दत्तस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची स्तुती केल्याचे जाणवले.

९. पू. दीक्षितआजींचा सन्मान सोहळा चालू असतांना पू. आजींची ग्रामदेवता भावसत्संगाच्या ठिकाणी आल्याचे जाणवणे

कार्यकारणभाव : ‘काही दिवसांपूर्वी जेव्हा पू. आजी रामनाथी आश्रमात येण्यासाठी बेळगावहून निघाल्या होत्या, तेव्हा ग्रामदेवतेने बेळगाव पणजी महामार्गावर स्थुलातून झेंडूची फुले अंथरली होती’, अशी अनुभूती डॉ. अंजेश कणंगलेकर यांनी कार्यक्रमाच्या वेळी सांगितली. जेव्हा पू. आजींचा सन्मान सोहळा चालू होता, तेव्हा बेळगावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीदेवी कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून आल्याचे मला जाणवले. यावरून एखाद्या गावात कुणी संतपद प्राप्त केले, तर त्या गावच्या ग्रामदेवतेला पुष्कळ आनंद होतो’, हे या सूत्रांवरून शिकायला मिळाले.

१०. भावसत्संगाच्या ठिकाणी पू. आजींचे यजमान (कै.) पू. नीलकंठ दीक्षित आजोबा जनलोकातून आल्याचे जाणवणे : जेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती विजया दीक्षितआजी यांनी ७१ टक्के पातळी गाठून संतपद प्राप्त केल्याचे घोषित केले, तेव्हा ‘पू. आजींचे यजमान (कै.) पू. नीलकंठ दीक्षितआजोबा जनलोकातून पृथ्वीच्या कक्षेत येऊन हा भावसत्संग पहात आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा मला (कै.) पू. नीलकंठ दीक्षितआजोबा यांच्या ठिकाणी निळसर रंगाची कांती असलेल्या त्रिमुखी दत्ताचे दर्शन झाले. (कै.) पू. नीलकंठ दीक्षितआजोबा यांनी देहत्यागापूर्वी पृथ्वीवर असतांना दत्तोपासना केल्याचे जाणवले. ((कै.) पू. नीलकंठ दीक्षितआजोबा आणि पू. दीक्षितआजी यांच्या कुटुंबाने दत्ताची उपासना केली असून त्यांच्या घरी दत्तात्रेयाची मूर्तीही आहे. – श्री. सत्यकाम कणगलेकर)

कार्यकारणभाव : पू. (श्रीमती) दीक्षितआजी त्यांच्या यजमानांना गुरुस्थानी मानून त्यांची सेवा करायच्या. त्यामुळे त्यांचे त्यांच्या यजमानांशी गुरु-शिष्याचे आध्यात्मिक नाते होते. शिष्यरूपी धर्मपत्नीने संतपद प्राप्त केल्याचे समजल्यावर गुरुरूपी (कै.) पू. दीक्षितआजोबा यांना आनंद झाल्यामुळे ते भावसत्संगाच्या ठिकाणी सूक्ष्मातून आले आणि त्यांनी सर्व साधकांना आशीर्वाद दिला.

११. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पू. दीक्षितआजींचा सन्मान करत असतांना ‘साक्षात् श्री महालक्ष्मीदेवी सरस्वतीस्वरूपातील पू. दीक्षितआजींचा सन्मान करत आहेत’, असे जाणवणे

कार्यकारणभाव : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्यात जन्मत:च श्रीमहालक्ष्मीतत्त्व कार्यरत असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी महालक्ष्मीदेवीचे दर्शन झाले. पू. दीक्षित आजींसारख्या संतांच्या भक्तीभावामुळे पृथ्वीवर हिंदु राष्ट्र लवकर येणार आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी ईश्वराची ज्ञानशक्ती कार्यरत होऊन श्री सरस्वतीदेवीचे तत्त्व कार्यरत असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी सरस्वतीदेवीचे दर्शन झाले. ‘श्री महालक्ष्मीदेवीने सरस्वतीदेवीचे औक्षण करून तिचा सन्मान केला आहे’, असे जाणवले.

१२. भावसत्संगाच्या ठिकाणी अनेक पणत्या तेवतांना दिसणे आणि ‘देवदिवाळी आरंभ झाली आहे’, असे जाणवणे

कार्यकारणभाव : पू. दीक्षितआजींचे संतपद घोषित केल्यामुळे सर्व देवतांनाही आनंद झाला. स्वर्गलोकातील देवतांनी पू. दीक्षितआजींचे स्वागत करण्यासाठी भूलोक (पृथ्वी) ते जनलोक या आकाशमार्गामध्ये इंद्रधनुष्याच्या सप्तरंगाच्या पायघड्या घातल्या होत्या आणि या पायघड्यांच्या दोन्ही बाजूंना दिव्य तेजाच्या लक्ष-लक्ष पणत्या लावल्या होत्या. ‘पू. दीक्षितआजींनी संतपद प्राप्त केल्याचा आनंद देवतांना झाल्यामुळे त्यांनी देवदिवाळी साजरी केली आहे’, असे मला जाणवले.

१३. देवाने पू. दीक्षितआजींचे संतपद त्यांच्या जन्मदिवशी घोषित करून त्यांना आध्यात्मिक भेट देणे

कार्यकारणभाव : ‘१७.११.२०२१’, म्हणजे ‘कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी’ या तिथीला पू. दीक्षितआजींचा तिथीनुसार वाढदिवस आहे. या तिथीला त्यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केले. ‘९०’ या अंकात ९ आणि ० हे दोन आकडे आहेत. त्यांची बेरीज केल्यावर ‘९’ अंक प्राप्त होतो. (९ + ० = ९) अंकशास्त्रानुसार ‘९’ अंक हा ‘स्थिरता आणि परिपूर्णता’ यांचे द्योतक आहे. पू. आजींनी ९० व्या वर्षात पदार्पण केल्यावर त्यांना संतपद प्राप्त झाल्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या स्थिरता आणि परिपूर्णता प्राप्त झाली. अशाप्रकारे विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांनी पू. दीक्षितआजींना त्यांच्या वाढदिवसाला संतत्वाची अमूल्य भेट दिली.

१४. संपूर्ण कार्यक्रम चालू असतांना माझ्या मनातील विचार न्यून होऊन मला (सूक्ष्म परीक्षण करणारीला) जागृत ध्यानावस्था अनुभवण्यास मिळणे

कार्यकारणभाव : पू. दीक्षितआजी शिवदशेत असल्यामुळे त्यांच्याकडून निर्गुण स्तरावरील चैतन्य प्रक्षेपित होत होते. त्यामुळे माझ्या मनातील विचार न्यून होऊन मला जागृत ध्यानावस्था अनुभवण्यास मिळाली.

१५. पू. दीक्षित आजींच्या अनाहतचक्रातून निळसर आणि गुलाबी, आज्ञाचक्रातून पिवळसर अन् सहस्रारचक्रातून पांढर्‍या रंगाच्या प्रभावळी वातावरणात प्रक्षेपित होणे

कार्यकारणभाव : पू. आजींनी भक्तीमार्गानुसार साधना केल्यामुळे त्यांच्या हृदयातून भक्तीच्या निळसर आणि प्रीतीच्या गुलाबी रंगाच्या प्रभावळी वातावरणात प्रक्षेपित झाल्या. पू. आजींनी काही काळ ज्ञानमार्गानुसार साधना केल्यामुळे त्यांच्यामध्ये ज्ञानशक्ती आणि चैतन्य कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या आज्ञाचक्रातून पिवळसर रंगाची प्रकाशवलये वातावरणात प्रक्षेपित झाली. पू. आजींनी कर्मयोगानुसार साधना केल्यामुळे त्यांच्यामध्ये व्यापकत्व आणि प्रीती वाढली आहे. पू. आजी जागृत समाधी-अवस्थेत असल्यामुळे त्यांच्या सहस्रारचक्रातून निर्गुण चैतन्याची पांढर्‍या रंगाची वलये वातावरणात प्रक्षेपित झाली.

१६. पू. विजया दीक्षितआजी यांनी विविध योगमार्गांनुसार केलेल्या साधनेचे प्रमाण

१७. पू. दीक्षितआजींकडून विविध स्तरांवरील घटकांचे प्रक्षेपण होणे

कृतज्ञता : परात्पर गुरुदेव, तुमच्या कृपेमुळे पू. दीक्षित आजींच्या रूपाने आम्हाला अनमोल संतरत्नाची गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली आणि त्यांच्या दिव्यत्वाची अनुभूती आली’, यासाठी मी आपल्या कृपावत्सल रूपाप्रती कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.

या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक