भारतात चालू असलेली फितुरी : तेव्हाची आणि आताची !

प्राचीन काळी प्रचंड मोठ्या हिंदुस्थानातील हिंदु राजांनी एकमेकांना साहाय्य न केल्यामुळे इस्लामी राज्यकर्त्यांनी त्याचा अपलाभ घेऊन राज्य केले. आपल्यापैकी काही जण त्यांना मिळाल्यानेही हिंदु राजांचा पराभव झाला. आजही अनेक जण विविध माध्यमांतून देशाशी घोर प्रतारणा करत आहेत.

श्री. शंकर गो. पांडे

१. स्वधर्मी (हिंदु) राजाचा पराभव करण्यासाठी अन्य धर्मीय (इस्लामी) राजाचे साहाय्य घेणारे राजे

मोगल या देशात येण्यापूर्वी भारतात शेकडो राजे आणि त्यांचे त्यांच्या सामर्थ्यानुसार लहान-मोठ्या अशा भूप्रदेशावर प्रभुत्व होते. या सर्वांची मातृभूमी, धर्म, धर्मग्रंथ, देवता, श्रद्धास्थाने इत्यादी सारखी आणि एकच होती, तरी त्यांच्यात एकी नव्हती. त्यांच्यातील शत्रुत्वापायी एखादा राजा परकीय आणि अन्य धर्मीय राजाला आमंत्रित करून त्याच्या साहाय्याने आपल्या स्वकीय आणि स्वधर्मीय राजाचा नाश करण्यास मागे-पुढे पहात नसे.

अ. गांधारचा (आजचे अफगाणिस्तान) राजा अंभी याने  इ.स.पूर्व ३२६ मध्ये ग्रीक राजा अलेक्झांडर याला पंजाबचा राजा पोरस याचा पराभव करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले होते.

आ. अजयमेरूचा (आजचे अजमेर) राजा पृथ्वीराज चौहान याचा पराभव करण्यासाठी कन्नोजचा राजा जयचंद राठोड याने महंमद घोरीला आमंत्रित करून पृथ्वीराजासह स्वतःचाही विनाश ओढवून घेतला होता.

२. अन्य धर्मीय शत्रूने आक्रमण केल्यावर स्वधर्मीय हिंदु राजाला साहाय्य न करणारे राजे

विशेष म्हणजे भारतात येऊन एखाद्या स्वधर्मीय राजावर परकीय आणि अन्य धर्मीय आक्रमकांनी जेव्हा जेव्हा आक्रमण केले, तेव्हा भारतातील इतर राजे आपल्या स्वधर्मीय राजाच्या साहाय्याला कधीच धावून आले नाहीत.

अ. महमूद गझनीने गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले. मंदिर उद्ध्वस्त करून तेथील सर्व संपत्ती लुटून नेली. तेव्हा त्याच्याशी केवळ एका भीम नावाच्या राजाने लढत दिली. भारतातील इतर राजे त्या वेळी स्वस्थ बसले होते.

आ. अल्लाउद्दीन खिलजीशी चितोडचे राणा रत्नसिंह एकटेच लढत असतांना इतर रजपूत राजांपैकी कुणीही त्यांच्या साहाय्याला आले नाहीत.

इ. त्याच अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रातील देवगिरीचे (आजचे दौलताबाद) राजे रामचंद्र यादव यांच्यावर आक्रमण करून त्या हिंदु साम्राज्याचा सर्वनाश केला. तेव्हासुद्धा इतर हिंदु राजे त्यांच्या साहाय्याला आले नाहीत.

ई. छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा हिंदवी स्वराज्य स्थापन करतांना ५ पातशाह्यांसमवेत स्वकीय सरदार, वतनदार यांच्याशीही लढाया कराव्या लागल्या. त्यांची संपूर्ण भारत इस्लाममुक्त करण्याची महत्त्वाकांक्षा होती; पण कुणाही रजपूत राजांनी त्यांना साथ नाही दिली. उलट इस्लामी राज्यकर्त्यांची चाकरी करून छत्रपती शिवाजी महाराजांना सातत्याने पराभूत करण्याचा प्रयत्न केला.

उ. आजही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधातही यापेक्षा वेगळे काही घडत आहे, असे नाही. ते स्वधर्म, स्वदेश यांसाठी जिवावर उदार होऊन निःस्वार्थपणे लढत आहेत; पण आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी हिंदूच त्यांना हतोत्साहित करत आहेत.

३. मुसलमान काफिरांमध्ये भेद करत नाहीत; आम्ही मात्र पंथ, जात, प्रांत, भाषा यांद्वारे भेद करून देशाची हानी करणे !

भारतावर महंमद बिन कासिम, महमूद गझनी, महंमद घोरी, तैमुरलंग, बाबर इत्यादी इस्लामी आक्रमकांनी अनेक आक्रमणे केली. त्या वेळेस त्यांनी हा हिंदु, हा बौद्ध, हा जैन, हा शीख असा धर्मभेद आणि हा ब्राह्मण, हा मराठा, हा तेली, हा कुणबी, हा दलित असा जातीभेद, तसेच हा महाराष्ट्रीय, हा गुजराती, हा पंजाबी, हा बंगाली असा प्रांतभेद किंवा हा दरिद्री, हा श्रीमंत असा वर्गभेद; किंबहुना असा कोणताच भेदाभेद त्यांनी केला नाही. वर्ष १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या काळात धर्मांधांनी हत्या करतांना, वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून मुसलमानेतरांना हाकलून देतांना, आतंकवाद्यांनी भारतात बाँबस्फोट करून जीवितहानी करतांना कधी धर्मभेद, जातीभेद किंवा प्रांतभेद असा कोणताच भेद केला नाही. ‘जो मुसलमान नाही तो काफिर’, हाच एक निकष लावून त्यांनी भारतियांच्या सरसकट हत्या केल्या; पण आम्ही मात्र हिंदु, बौद्ध, जैन, शीख, ब्राह्मण, मराठा, महाराष्ट्रीय, गुजराती, बिहारी, बंगाली, हिंदी, मराठी, तमिळी अशा प्रकारचे धर्म, पंथ, जात, प्रांत, भाषा असे अनेक भेद जोपासून स्वतःची शक्ती विभाजित करत असतो. भारतातील अनेक पक्षांची राजकीय दुकानदारी धर्म, प्रांत, जात, भाषा अशा नानाविध भेदांवरच चालू आहे. त्यामुळे हे सारे भेद कसे वाढतील, यासाठीच त्यांचे सारखे प्रयत्न चालू असतात. धार्मिक, जातीय, भाषिय अशा अस्मिता सातत्याने जागृत ठेवून येथील स्वार्थी नेत्यांनी स्वतःचा तर स्वार्थ साधलाच; पण या देशातील नागरिकांना सतत विभाजित आणि भांडत ठेवून देशाची अतोनात हानी केली.

४. स्वाभिमानशून्य हिंदू संघटित न होणे

केवळ ५-१० सहस्र इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले. यामागचे कारण इंग्रजांनी ‘फोडा आणि झोडा’ या सूत्राचा अवलंब केला होता आणि आम्हीही त्याला बळी पडलो. तत्कालीन बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्हने त्याच्या आत्मकथनात सांगितलेला एक प्रसंग असा – तो सांगतो, ‘भारतामध्ये आम्ही हिंदूंना दास बनवण्यासाठीचे पहिले युद्ध जिंकून विजयी मिरवणूक काढली, तेव्हा मिरवणूक पहाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जमलेले सहस्रो हिंदू टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत होते. ‘ज्या देशात आपला राजा हरल्यानंतर प्रजेकडून टाळ्या वाजवल्या जातात, तेव्हा त्या देशाला दास बनवणे किती सोपे आहे’, हे आमच्या तेव्हाच लक्षात आले. याउलट मिरवणूक पहाणार्‍या प्रत्येकाने आम्हाला एकेक दगड जरी उचलून मारला असता, तरी भारत वर्ष १७०० मध्येच स्वतंत्र झाला असता. त्या वेळेस भारतात आम्ही केवळ ३ सहस्र इंग्रज होतो.’’ स्वातंत्र्यवीर सावरकरसुद्धा म्हणाले होते, ‘भारतातील ३० कोटी हिंदूंनी एकाच दिवशी, एकाच वेळी, एकाच दिशेने थुंकायचे ठरवले, तरी त्या थुंकीच्या महापुरात भारतातील इंग्रज वाहून जातील’; पण दुर्दैवाने भारतातील हिंदू कधीच असे संघटित झाले नाहीत आणि आजही होत नाहीत.

५. भारतातील मुसलमान आणि हिंदू यांच्यातील भेद

अ. भारतात एक जरी मुसलमान मारला गेला, तर लाखो हिंदूच हिंदूंना धारेवर धरून संपूर्ण जगभर त्यांची अपकीर्ती करतात. आजपर्यंत पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, काश्मीर इत्यादी ठिकाणी सहस्रो हिंदू निर्दयपणे मारले गेले; पण याविरुद्ध देशातील मुसलमानांनी कधीच निषेध उच्चारलेला नाही.

आ. आजही सी.ए.ए. (नागरिकता सुधारणा कायदा) आणि एन्.आर्.सी. (राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया) यांच्या संदर्भात हिंदूंकडून इतिहासातील चुकांचीच पुनरावृत्ती होत आहे. देशातील मुसलमान समाज वरील दोन कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करत होते.

६. भारतात पूर्वापारपासून देशद्रोह्यांची परंपरा असणे

असे म्हणतात की, युद्धाच्या प्रसंगी शत्रूचे सैन्य किती आहे ? हे मोजण्यापेक्षा आपल्यात देशद्रोही (फितूर) किती आहेत ? याची मोजणी करून प्रथम त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे; कारण हे द्रेशद्रोहीच शत्रूसैन्यापेक्षा अधिक घातक असतात. दुर्दैवाने भारताच्या पूर्वापारपासून अंभी, जयचंद राठोड, सूर्याजी पिसाळ, गणोजी शिर्के अशा शेकडो देशद्रोह्यांची परंपरा चालत आली आहे. अशा देशद्रोह्यांमुळेच हिंदू नेहमी पराभूत होत आले आहेत.

७. बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांना अधिकृतरित्या वसवणार्‍या देशद्रोही ममता बॅनर्जी !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात, ‘‘बंगालमधील सर्व बांगलादेशी घुसखोर भारतीय आहेत.’’ त्यांनी आतापर्यंत बंगालमधील घुसखोरांच्या ११९ वसाहती नियमित करून वर्ष २०१४ पासून १५ सहस्र बांगलादेशींना भारताचे नागरिकत्व दिले आणि घोषित केले, ‘बंगालमधून एकही बांगलादेशी घुसखोर बाहेर जाणार नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे एकाही भारतीय मुसलमानाचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही’, हे वास्तव वारंवार सांगूनही विरोधी पक्षाकडून मुसलमानांच्या मनात या कायद्याविषयी विष पेरण्याचे काम करण्यात आले आहे.

८. ‘एन्.आर्.सी.’ला विरोध करण्यासाठी निरर्थक जातीयवादी विधाने करणारे जितेंद्र आव्हाड !

राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, ‘‘मनुवादी जातीव्यवस्थेने अधिकार नाकारलेल्या लोकांनी नागरिकत्वाचे पुरावे कुठून आणायचे ?’’ प्रश्न असा पडतो की, शासकीय सुविधा आणि अनुदाने घेतांना मागितले जाणारे सर्व पुरावे आम्ही आकाश-पाताळ एक करून गोळा करतो. मग नागरिकत्वाचे पुरावे गोळा करण्यात अडचण का यावी ?

९. आधुनिक काळात प्रत्येक गोष्टीसाठी पुरावे लागत असतांना नागरिकत्वासाठी विरोध का ?

जे खरोखरच भारतीय आहेत, त्यांना ‘एन्.आर्.सी.’ची भीती का वाटावी ? आणि ज्यांना अशी भीती वाटते त्यांना भारतीय तरी का म्हणावे ? शहरातील एखाद्या संकुलामधील विशिष्ट सदनिकाधारकाकडे जायचे म्हटले, तरी प्रथम तेथील सुरक्षारक्षकाला आपले ओळखपत्र दाखवावे लागते आणि सदनिकाधारकाला दूरभाष करून ‘अमुक व्यक्तीला तुमच्या घरी येऊ द्यायचे का ?’, अशी विचारणा करावी लागते. तशी अनुमती मिळाल्यानंतरच पुढे जाता येते. मग एखाद्या देशात रहाण्यासाठी तिथले नागरिकत्वाचे लाभ घेण्यासाठी ओळख मागितली, तर एवढे आकांडतांडव करण्याचे काय कारण ? विशेष म्हणजे नागरिकत्वाचे पुरावे नाकारणार्‍यांनीच त्रेतायुगात होऊन गेलेल्या आणि आजही हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले होते. याच भाजप आणि हिंदुत्व विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ आणि ‘एअर स्ट्राईक’चे पुरावे मागण्याचा निर्लज्जपणा केला होता.

१०. अयोध्येत मशिदीसाठी समिती नेमण्याची मागणी करणारे हिंदु नेते !

हिंदु विरोधकांना स्वतः ‘हिंदु’ असूनही अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीचा निर्णय हिंदूसारखा लागल्याचे पाहून मनस्वी दुःख झाले. ‘श्रीराम मंदिर बांधण्यासाठी शासनाने जशी न्यासाची स्थापना केली आहे, तशी ती मशिदीसाठीही करावी’, अशी मागणी कोण्या मुसलमान नेत्याने केलेली नाही, तर एका हिंदु नेत्याने केली आहे. शिवसेनेशी टोकाचे मत आणि मनभेद असूनही केवळ सत्तेसाठी महाआघाडीचे शासन स्थापन करणारे काँग्रेसचे अन् राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते म्हणतात, ‘‘आम्ही मुसलमानांच्या मतांमुळे सत्तेत आलो’’, तर दुसरे नेते म्हणतात, ‘‘आम्ही केवळ मुसलमानांच्या हितासाठीच सत्तेत सहभागी झालो.’’ म्हणजे हिंदूंचे मत आणि त्यांचे हित गेले खड्ड्यात ! हिंदूंच्या मतांवर निवडून येणार्‍या हिंदुविरोधी पुढार्‍यांनी तरी हिंदूंची काळजी का करावी ? कारण हिंदूंना कितीही लाथा घातल्या, तरी तो आपल्यालाच मतदान करणार आहे, याची त्यांना निश्चिती आहे.

११. भारताला खरा धोका स्वार्थी आणि विकाऊ हिंदूंकडूनच अधिक !

मुख्य म्हणजे असेही दिसून आले आहे की, बहुतांश हिंदूंना ‘देशाचे शासनकर्ते कोण व्हावेत ? त्यांची पात्रता काय असावी ?’, याच्याशी काहीच देणे-घेणे नसते. राष्ट्र आणि स्वधर्म यांच्या हिताचा विचार तर त्यांच्या गावीही नसतो. पैसा घेऊन मत विकणार्‍या आणि जात पाहून मतदान करणार्‍या मतदारांची संख्या भारतात कोट्यवधीमध्ये आहे. भारतातील मतदारांना वीज, पाणी, शिक्षण, वाहतूक व्यवस्था अशा अनेक सुविधा (सवलती) फुकट देणारे आणि पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य, भाजीपाला अशा अनेक वस्तू स्वस्तात देणारे शासन पाहिजे असते. देहली आणि पंजाबमधील मतदारांनी याचा प्रत्यय नुकताच आणून दिला आहे. सार्‍या सोयीसुविधा फुकट आणि सार्‍या जीवनावश्यक वस्तू स्वस्तात देणारे केजरीवाल असो किंवा ओवैसी असो, भारतीय मतदार त्यांना भरभरून मतदान केल्याविना रहात नाहीत. या देशाला आणि देशातील लोकशाहीला खरा धोका धर्मांध अन् कट्टर मुसलमानांपेक्षा अशा स्वार्थी, विकाऊ, जातीय आणि अज्ञानी हिंदूंकडूनच अधिक आहे.

(ऑक्टोबर २०२२)

संपादकीय भूमिका

देशाला खरा धोका परकियांपेक्षा स्वार्थी, जातीय अन् विकाऊ घरभेद्यांकडूनच अधिक असल्याने सरकारने त्यांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा !