देशभक्त आणि आध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन करणार्‍या ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन !

ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी

पुणे – ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी (वय ९५ वर्षे) यांचे २७ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १ वाजता तुळशीबागवाले कॉलनीतील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. रत्नागिरी येथे १३ फेब्रुवारी १९२७ या दिवशी जन्म झालेल्या जोशी या पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या अनुग्रहित शिष्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना मुलगी मानत असत. कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने मृणालिनी जोशी यांनी लिखाणाला प्रारंभ केला होता. देशभक्त, आध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन, काव्यलेखन यांवर त्यांनी भर दिला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निधनाविषयी दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

जोशी यांचे शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘इन्कलाब’ ही कादंबरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्राय स्वाहा:’ कादंबरी, शंकर महाराज यांच्या जीवनावर आधारित शंकरलीला, पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनावर आधारित अमृतसिद्धी, स्वा. सावरकर यांच्या जीवनातील अंतिम कालखंडावरील ‘अवध्य मी ! अजिंक्य मी !!’ ही कादंबरी इत्यादी त्यांचे साहित्य गाजले.

त्यांच्या ‘इन्कलाब’ या कादंबरीचे हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांमध्ये, तर ‘राष्ट्राय स्वाहा:’ या कादंबरीचे हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. वर्ष २००६ मध्ये डॉ. वि.रा. करंदीकर यांच्या हस्ते त्यांना ‘स्नेहांजली’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद, आचार्य रजनीश ‘ओशो’, दत्तोपंत ठेंगडी, बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी, जगन्नाथराव जोशी अशा अनेक मोठ्या व्यक्तींचा सहवास त्यांना लाभला होता. ज्योतिषशास्त्राची आवड असलेल्या जोशी यांचे म.दा. भट आणि व.दा. भट या दिग्गजांशी संबध होते.