पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पाठवलेला मोठा शस्त्रसाठा सैनिकांनी पंजाबमधून केला जप्त !

३ एके-४७, ३ पिस्तुले, बंदुकीच्या २०० गोळ्या आदी साठा मिळाला !

फिरोजपूर (पंजाब) – येथे सीमा सुरक्षा दलाने शस्त्रास्त्रांनी भरलेली बॅग जप्त केली आहे. ही बॅग ड्रोनच्या माध्यमातून येथे पोचवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार फिरोजपूर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या १३६ बटालियनच्या वतीने शोध मोहीम राबवण्यात आली. भारत-पाक सीमारेषेजवळ एक मोठी बॅग दिसली. त्याची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूगोळा भरला असल्याचे समोर आले.

सीमा सुरक्षा दलाला मिळालेल्या या बॅगेमध्ये ३ एके-४७, ५ एम्.पी.-५ (छोटी एके-४७), ३ पिस्तुले आणि १७ रिकामी मॅगझीन जप्त केली. याखेरीज ३० बोअरच्या १०० गोळ्या आणि ५.५६ एम्.एम्.च्या १०० गोळ्या जप्त करण्यात आल्या.

सैनिकांचे लक्ष वळवण्यासाठी ड्रोनचा वापर !

शस्त्रांची एवढी मोठी खेप पंजाबमध्ये पाठवून तेथील वातावरण बिघडवण्याचा पाकचा उद्देश आहे. पाकिस्तानातील आतंकवाद्यांना पंजाबमधील अमली पदार्थ तस्कर आणि गुंड यांचा वापर करून पंजाबमध्ये दहशत पसरवायची आहे. यापूर्वी सातत्याने पाठवले जाणारे ड्रोन हे सीमा सुरक्षा दलाचे लक्ष वळवण्यासाठीच असू शकतात, असे तज्ञांचे मत आहे. सैनिकांचे लक्ष दुसरीकडे वळवून प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि हेरॉईनची खेप पंजाबकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे जप्तीच्या कारवाया करण्यापेक्षा ‘सौ सुनार की, एक लुहार की’, यानुसार पुढे जाऊन एकदाच जिहादी आतंकवादाचा पोशिंदा असलेल्या पाकला नष्ट करणे अधिक श्रेयस्कर आहे, हे शासनकर्ते केव्हा लक्षात घेणार ?