(म्हणे) ‘ग्रहण अशुभ नसते, यामुळे गरोदर महिलांना ग्रहण पाळायची सक्ती करू नका !’

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सांगली-मिरज स्त्रीरोग तज्ञ संघटना यांचे संयुक्त निवेदन

सांगली – ग्रहण हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या सावल्यांचा खेळ असतो. त्यामुळे ग्रहणाच्या संदर्भात अंनिसने प्रबोधन मोहीम चालू केली असून यात ‘सांगली-मिरज स्त्रीरोग तज्ञ संघटना’सुद्धा सहभागी झाली आहे. दोन्ही संघटनांच्या निवेदनात म्हटले आहे की, सूर्यग्रहणासारख्या सुंदर खगोलीय घटनेला अशुभ मानणे चूक आहे. ग्रहणकाळात हानीकारक किरणे निघत नाहीत, तसेच अन्न-पाणी दूषित होत नाही. ग्रहणकाळात गरोदर मातेला एका जागी अंधार्‍या खोलीत बसवतात, ते महिला आणि बाळ यांच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकते. ग्रहण हे अशुभ नसल्याने गरोदर महिलांना ग्रहण पाळायची सक्ती करू नये. (ग्रहणकाळात वातावरणातील वाढलेल्या रज-तमाचा व्यक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी काळजी घेणे अत्यावश्यक असते. महिलांनी भाजी चिरणे, फळे कापणे, अन्नग्रहण करणे, तसेच अन्य कृती न करता नामजप करणे, स्तोत्रपठण अशा सात्त्विक कृती करण्यास सांगितले आहे. एखाद्या महिलेने उलट कृती केल्याने त्याचा परिणाम लगेच बाळावर अथवा महिलेवर होईलच असे नाही, तर हा परिणाम नंतरही होऊ शकतो ! नंतर झालेला परिणाम हा ग्रहणामुळे झाला, हेही अंनिस मान्य करील, असे सांगू शकत नाही ! ग्रहण पाळावे कि न पाळावे ? यासंदर्भात लहान मुले, गरोदर महिला, वयोवृद्ध व्यक्ती यांना धर्माने सक्ती केलेली नसते. त्यामुळे अंनिसने तोंडाची वाफ दवडू नये.- संपादक)

ग्रहणकाळात गर्भवतीने काम केल्यास बाळाचे ओठ फाटतात, याला वैद्यकीय आधार नाही. गर्भाचा विकास ८ व्या मासांपर्यंत पूर्ण झालेला असून त्यासाठी ‘क्रोमोसोम्स’, तसेच त्यावरील जनुके उत्तरदायी असतात. वैज्ञानिक दृष्टीकोनातून गरोदर मातेला ग्रहण पाळायला लावू नका, असे आवाहन अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि स्त्रीरोगतज्ञ संघटनेचे तज्ञ यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंचा बुद्धीभेद करून अधर्माचरणाकडे नेऊ पहाणार्‍या अंनिसवर बंदी का घालू नये ? असे जनतेला वाटते !
  • विज्ञानामध्ये एक प्रयोग केल्यावर नाही, तर अनेक प्रयोगांचा एकच निष्कर्ष आल्यावर ती गोष्ट सिद्ध झाली, असे म्हणू शकतो. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उगाचच फुकाच्या गप्पा मारू नये आणि हिंदु धर्माची अपकीर्ती करू नये !