राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांच्या तिकिटाचे दर दिवाळीपुरते वाढणार !

दिवाळीसाठी १ सहस्र ४९४ जादा गाड्या सोडणार

मुंबई – राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांच्या तिकिटाचे दर दिवाळीच्या सुट्ट्यांपुरते १० टक्क्यांनी वाढणार आहेत. ही हंगामी भाडेवाढ २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल.

त्याचसमवेत दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी १ सहस्र ४९४ अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. २१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत अधिकच्या गाड्या धावतील.

दिवाळीच्या काळातही ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ आणि ६५ ते ७५ वयोगटातील नागरिकांना सर्व सेवांमधून देण्यात येणारी ५० टक्के सवलत कायम रहाणार आहे.

संभाजीनगर विभागातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ आणि अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येणार आहेत.

संपादकीय भूमिका 

खासगी गाड्यांच्या दरामध्ये सुट्ट्यांच्या काळात अवाच्या सवा भाडेवाढ केली जात असल्याने सामान्य नागरिकांना एस्.टी.च्या गाड्यांचा दिलासा होता; परंतु त्यांनीही आता हंगामी भाडेवाढ केल्याने सामान्य नागरिकांनी काय करावे ?; परंतु तरीही खासगी बसगाड्यांच्या भाडेवाढीला निर्बंध नसल्याने त्या तुलनेत ही नियंत्रित भाडेवाढ नागरिकांना कधीही परवडेल !