काश्मीरप्रश्नी कुणाच्या मध्यस्थीची आवश्यकता नाही ! – भारताने ठणकावले

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची

नवी देहली – काश्मीरप्रश्नी कुणाच्या मध्यस्थीची आवश्यकता नाही. जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करणार्‍या पाकिस्तानमधील आतंकवाद्यांवर कारवाई करणे अधिक आवश्यक आहे, अशा प्रकारे भारताने पाकिस्तानसह जर्मनीला ठणकावले आहे. काश्मीरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घ्यावा, असे वक्तव्य पाकिस्तान आणि जर्मनी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केले होते. भारताने त्यावर आक्षेप घेतला आहे.

काश्मीर हे पाकिस्तानसमवेतचे द्विपक्षीय सूत्र असून तिसर्‍या देशाला अथवा तिसर्‍या पक्षाला हस्तक्षेप करण्याची काहीही आवश्यकता नसल्याचेही भारताने या वेळी म्हटले. आंतरराष्ट्रीय आतंकवाद आणि विशेषत: सीमेपलीकडून होणार्‍या आतंकवादावर भूमिका घेणे, हे जगातील सर्वच देशांचे दायित्व असल्याचे वक्तव्य परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याआधीच केले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये मानवी अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे प्रादेशिक शांतता आणि स्थिरता यांना धोका निर्माण झाला असल्याचे वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी केले होते. ‘आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार जम्मू-काश्मीरवर तोडगा काढल्याखेरीज दक्षिण आशियामध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही’, असेही भुट्टो यांनी म्हटले होते. (वास्तविक शांतता प्रस्थापित होण्यासाठी जिहादी आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट केले पाहिजे आणि भारत येणार्‍या काळात ते करील, हे भुट्टो यांनी विसरू नये ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • जिहादी पाकला आता शाब्दिक स्वरूपात ठणकावणे पुरेसे नाही, तर त्याला कायमचा धडा शिकवणेच आवश्यक आहे, हे भारतीय शासनकर्ते लक्षात घेतील का ?