हिंदू संघटित झाले नाहीत, तर मारले जातील ! –  शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती

जयपूर (राजस्थान) – हिंदू संघटित झाले नाहीत, तर मारले जातील. हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे केले. ते गोविंद देवजी मंदिरात सर्व समाज हिंदु महासभेने आयोजित केलेल्या धार्मिक सभेला संबोधित करत होते. ‘नुपूर शर्मा ज्या बोलल्या होत्या ते योग्यच होते. त्यावर एवढा गोंधळ का केला जात आहे ?’, असेही ते या वेळी म्हणाले. शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे हिंदु राष्ट्र परिसंवादाच्या वेळी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी मांडलेली सूत्रे पुढील प्रमाणे आहेत.

येशू ख्रिस्त आणि महंमद पैगंबर यांचे पूर्वज सनातनी वैदिक हिंदू होते !

जगभरातील लोकांचे पूर्वज सनातनी वैदिक हिंदू होते. येशू ख्रिस्त आणि महंमद पैगंबर यांचे पूर्वजही हिंदू होते. ते सनातनी वैदिक आर्य होते.

मी स्वाक्षरी केली असती, तर अयोध्येत श्रीराममंदिराच्या शेजारी मशीद उभी राहिली असती !

माझ्याखेरीज सर्व शंकराचार्यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सांगण्यावरून ‘रामालय ट्रस्ट’वर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. अयोध्येत मंदिर आणि मशीद दोन्ही बांधणे हे त्यांचे ध्येय होते. मी स्वाक्षरी केली असती, तर श्रीराममंदिराला लागून त्याचवेळी मशीद बांधली गेली असती. योगी आदित्यनाथ आणि सर्वोच्च न्यायालय यांनी बाबरीच्या बदल्यात मुसलमान पक्षाला ५ एकर भूमी दिली.

उत्तरप्रदेशात ३ नवे पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रस्ताव स्वीकारला ?

अयोध्येत रामजन्मभूमीवर श्रीरामंदिर बांधण्याची मोहीम राबवली गेली. मुसलमान पक्षाला कायदेशीररित्या ५ एकर भूमी दिली आहे. काशी आणि मथुरा येथेही याची नक्कल होईल. एका उत्तरप्रदेशातच ३ नवे पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रस्ताव स्वीकारला गेला.

सरकारने समान नागरी कायद्याचे स्वरूप स्पष्ट करावे !

सर्वप्रथम शासनप्रणालीने समान नागरी कायद्याचे स्वरूप स्पष्ट केले पाहिजे, नंतरच त्याचा विचार करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण इतरांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतो, तेव्हा आपणही इतरांशी तसेच वागले पाहिजे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) आणि ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ (सर्वे सुखी व्हावेत) हे समान नागरिकत्वाचे सूत्र असू शकते.

दलित शब्दाद्वारे हिंदूंमध्ये फूट पाडली गेली !

‘दलित’ हा शब्द वापरून समाजात फूट कुणी पाडली ? शरिरात डोके, हात आणि पाय वापरले जातात कि नाही ? त्यांच्यात संघर्ष झाला, तर जीवन रहाणार का ? डोळा डोळ्याचे काम करतो, कान कानाचे काम करतो. या सर्वांची उपयुक्तता आणि सुसंवाद आहे, तेव्हाच जीवन चालते. समाजासाठी शिक्षण, संरक्षण, सेवा आणि स्वच्छता या गोष्टी उपलब्ध आहेत. त्यासाठी धर्मातून वर्णव्यवस्था आवश्यक आहे कि नाही ? ही व्यवस्था लोकाभिमुख आहे, ती सनातनची परंपरा आहे. प्रत्येक व्यक्तीची उपजीविका (रोजगार) जन्मापासून सुरक्षित असायला हवी, हे सत्य सनातन धर्मात सांगण्यात आले आहे.

हिंदु राष्ट्राचे ध्येय !

सुशिक्षित, सुसंस्कृत, सुरक्षित, समृद्ध, सेवाभिमुख, निरोगी, सर्वोपयोगी व्यक्ती आणि समाजाची रचना हे हिंदु राष्ट्राचे ध्येय आहे.

गोरक्षकांना ‘गुंड’ ठरवले, तर गोहत्या होणारच !

गोवंशाचे रक्षण झाले पाहिजे; मात्र एका मोठ्या व्यक्तीने म्हटले, ‘गोरक्षक गुंड आहेत.’ सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले, ‘गोरक्षक गुंड आहेत.’ जर देशाचे सर्वोच्च नेते आणि न्यायालय यांचे वाक्य एकच असेल, तर गोहत्येचा मार्ग प्रशस्त झाला. त्यामुळे गोवंशियांची हत्या तर होणारच.

श्रीमद्भगवद्गीता आणि बायबल

श्रीमद्भगवद्गीतेचा भाग बायबलमधून काढून टाकला तर बायबलच रहाणार नाही. स्वतः अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर विश्‍वास ठेवला होता.

सनातनचे महत्त्व !

भ्रमणभाष, संगणक आणि उपग्रह यांच्या युगातही सनातन धर्म सर्वांत महत्त्वाचा आहे; कारण तिथे कवेळ सनातन आहे, जे शाश्‍वत आहे.

संपादकीय भूमिका

हिंदू संतांचे ऐकत नाहीत. त्यामुळे आताच ते अनेक ठिकाणी मारले जात आहेत, ही वस्तूस्थिती आहे आणि पुढेही आता वागतात, तसेच वागले, तर यात काही पालट होणार नाही, हेही तितकेच खरे !