परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत यांच्या मार्गदर्शनानुसार आध्यात्मिक वाटचाल करणारे पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर (वय ७७ वर्षे) !

संभाजीनगर येथील सनातनचे ९७ वे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा साधनाप्रवास…

२०.९.२०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पू. चपळगावकर यांनी ‘हिंदूंवर अन्याय होत असलेला पाहून सनातन संस्थेला कसे साहाय्य केले ?’, ते पाहिले. आजच्या भागात त्यांचे हे योगदान आणि साधनेत प्रगती करण्याच्या इच्छा यांमुळे त्यांनी केलेली प्रगती अन् त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव पहाणार आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/613942.html

(पू.) निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर

७. सनातन संस्थेवर बंदी येणार असल्याची वार्ता पसरली असतांना साधकांना त्या कायद्याविषयी माहिती दिल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावरचा आत्मविश्वास एक वेगळाच आनंद देऊन जाणे

त्या काळात ‘सनातन संस्थेवर बंदी येणार’, अशी दाट आवई पसरली होती. तेव्हा मी संबंधित कायद्याचे पुरेसे वाचन करून, ठिकठिकाणी जाऊन तो कायदा सनातन संस्थेच्या साधकांना समजावून सांगायला सुरुवात केली. तेव्हा साधकांच्या चेहर्‍यावर दिसून येणारा आत्मविश्वास मला एक वेगळाच आनंद देऊन जात असे.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होऊन ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणे

८ अ. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाणे : एवढे होईपर्यंत आश्रम किंवा अध्यात्म वगैरे विषय माझ्या मनातसुद्धा आले नव्हते. केवळ न्यायप्रियता आणि अन्याय होत असलेल्यांच्या मदतीला जाण्याच्या स्वभावामुळे मी येथपर्यंत आलो होतो. अचानक मला सांगण्यात आले, ‘मला आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात बोलावण्यात आले आहे.’ त्यानुसार आम्ही दोघेही संभाजीनगरहून बसने गोव्याला आश्रमात आलो.

८ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होणे आणि तेथून खर्‍या अर्थाने आध्यात्मिक प्रवासाला आरंभ होणे : आम्ही आश्रमात आल्यावर सायंकाळी आमची डॉ. आठवले (त्यांचा उल्लेख अतीव श्रद्धेने ‘परात्पर गुरु’ असा करण्यात येतो. मीही यापुढे तसाच उल्लेख करणार आहे.) यांच्याशी भेट झाली. काही वेळ आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी इतरांना उद्देशून माझ्याबद्दल काही सांगितले आणि तेथून माझा ६० टक्क्यांसह आध्यात्मिक प्रवास चालू झाला.

९. कर्नाटक भेटीच्या वेळी ‘एका निवृत्त मुख्य न्यायाधिशांची भेट होणे’, ही एका दृष्टीने मोठी अनुभूती असणे

त्यानंतर पुढे ‘कर्नाटक राज्यात जाऊन मी तेथील ठिकठिकाणच्या अधिवक्त्यांशी याविषयी चर्चा करावी’, असे मला सुचवण्यात आले. कदाचित् माझ्या पूर्वजांच्या कर्नाटक पार्श्वभूमीचे ते कारण असावे. तेव्हा संभाजीनगर येथील तरुण अधिवक्ते चारुदत्त जोशी माझ्या बरोबर होते. वर्ष २०२० च्या कोरोनाच्या लाटेत त्यांचे अकाली निधन झाले. तोपर्यंत ते सनातन संस्थेच्या सर्व कार्यक्रमांत सतत माझ्या बरोबर रहात असत. कर्नाटकच्या भेटीच्या वेळी ध्यानीमनी नसतांना माझी एका विभूतीशी भेट झाली. ते एक निवृत्त मुख्य न्यायाधीश होते. ते काही काळ राज्यपालही होते. ती भेट माझे जे दायित्व होते, त्याच्याशी संबंधित असल्यामुळे माझ्या दृष्टीने ती एक मोठी अनुभूतीच होती.

१०. नामजप, परमेश्वर आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्मरणाने आजारपणातून सहज बाहेर पडता येणे

वर्ष २०११ च्या शेवटी माझ्या पोटात कर्करोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यानंतरच्या काळात माझ्या दोन्ही डोळ्यांच्या मिळून ३ मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. या काळामध्ये कसलीही भीती न वाटता नामजप, परमेश्वर आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या स्मरणाच्या साहाय्याने त्यातून सहज बाहेर पडता आले.

११. वर्ष २०१२ पासून मी गोवा येथे चालू झालेल्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त माझ्या क्षमतेनुसार भाग घेतला.

१२. ‘पर्सनल लॉ’ या गोंडस नावाखाली हिंदूंसाठी तसा कोणताच समांतर कायदा सिद्ध केला न जाणे

स्वातंत्र्यानंतर लगेचच ‘हिंदु कोड बिल’ तयार करायला सुरुवात झाली आणि नंतर लगेचच विवाह, वारसा, दत्तक, पोषण वगैरे कायदे हिंदूंसाठी तयार करण्यात आले; परंतु ‘पर्सनल लॉ’ या गोंडस नावाखाली हिंदूंसाठी तसा कोणताच समांतर कायदा तयार करण्यात आला नाही. या वेळी ‘हिंदूंचाही ‘पर्सनल लॉ’ असू शकतो’, याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले.

१३. ‘अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक’ हे सनातन धर्मावर आघात करणारे आहे’, असे लक्षात आल्यावर त्याच्या विरोधात लढण्यास आरंभ करणे आणि शेवटी या विधेयकातील तथाकथित पुरोगामी कलमे वगळण्यात यश मिळणे

साधारण वर्ष २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती तथाकथित ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’चा धडाक्याने प्रचार करत होती. त्यावर सर्वत्र चर्चा चालू झाली होती. त्या विधेयकाचा साधारण अभ्यास केला असता हे संपूर्ण विधेयक सनातन धर्माच्या मुळावर असल्याचे माझ्या लक्षात आले. तोपर्यंत माझा धाकटा मुलगा चि. शैलेश हा वकिली व्यवसायामध्ये जोमाने पुढे येत होता. मी माझ्या परीने या तथाकथित पुरोगामी कायद्याला विरोध करायला सुरुवात केली. त्याच वेळी ‘सनातन संस्थे’च्या वतीनेही हाच कार्यक्रम विधायक मार्गाने हाती घेतला होता. अनेक संस्थांना भेटी देऊन या कायद्यातील फसवी शब्दरचना सर्वांच्या लक्षात आणून देण्यात आम्हाला पुरेसे यश आले. शेवटी डिसेंबर २०१३ मध्ये या तथाकथिक पुरोगामी कायद्यातील तथाकथित पुरोगामी कलमे वगळण्यात आली.

१४. आध्यात्मिक वाटचाल !

१४ अ. संतांच्या मार्गदर्शनाखाली साधना पुढे चालू रहाणे : एवढे होईपर्यंत माझी ‘आध्यात्मिक पातळी ६४ टक्के झाली आहे’, असे मला सांगण्यात आले. यानंतरच्या मार्गक्रमणासाठी ‘आध्यात्मिक मार्गदर्शन हवे’, हे माझ्या लक्षात आले. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माझी पुढील साधना चालू झाली.

१४ आ. आध्यात्मिक पातळी ६६ टक्के होणे, त्यानंतर ‘पुढची प्रगती कठीण आहे’, असे लक्षात येणे : मला वेळोवेळी सुचवण्यात आलेले अध्यात्मविषयक मार्गदर्शन दृष्टीसमोर ठेवून त्यानुसार माझा दिनक्रम चालू झाला. अशीच वाटचाल होत मी आध्यात्मिक पातळी ६६ टक्क्यांपर्यंत येऊन पोचलो. त्यानंतर मात्र ‘पुढची प्रगती कठीण आहे’, हे माझ्या लक्षात आले. आतापर्यंत मिळत असलेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनाला पुढे जोड मिळत गेली.

१४ इ. बुद्धीच्या स्तरावरून भावाच्या स्तरावर येण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागणे : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी मी प्रत्येक ४ मासांनी रामनाथी आश्रमात येऊन १० दिवस निरनिराळ्या वर्गांतून मार्गदर्शन घेतले. मला बुद्धीच्या स्तरावरून भावाच्या स्तरावर येण्यासाठी अतीव संघर्ष करावा लागला; कारण यापूर्वी माझे सर्व आयुष्य बुद्धीच्या पातळीवर संघर्ष करण्यात गेले होते. ‘द्रौपदीने राजसभेमध्ये केलेला बुद्धीच्या पातळीवरील वाद आणि तो विफल झाल्यानंतर श्रीकृष्णाचा केलेला धावा’, या महाभारतातील उदाहरणाचा मला फार मोठा उपयोग झाला.

१४ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून मिळालेल्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे प्रगती होत रहाणे : साधारण वर्ष २०१० पासून वर्ष २०१९ मध्ये माझे संतपद घोषित होईपर्यंत मी रामनाथी आश्रमाला वेळोवेळी दिलेल्या भेटीतून आणि तेथे मला परात्पर गुरु डॉक्टरांकडून मिळालेल्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे मी साधनेत पुढे पुढे सरकत आलो आहे.

१५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा !

१५ अ. ‘हिंदु राष्ट्र’ या संकल्पनेच्या संवर्धनासाठी विधायक मार्गाने आणि भरीव रितीने कार्य पुढे नेण्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा द्रष्टेपणा दिसून येणे अन् त्यांच्या निष्काम अलिप्तपणातून अनेक विचारवंत जोडले जाणे : ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना स्वातंत्र्यानंतर जवळजवळ लोप पावली होती. ही संकल्पना संपूर्ण भारतात प्रथमच स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे केवळ पुनरुज्जीवनच न करता त्या संकल्पनेच्या संवर्धनासाठी विधायक मार्गाने भरीव रीतीने पुढे नेण्यात परात्पर गुरूंचा द्रष्टेपणा दिसून येतो. या अभियानात जोडले गेलेले निरनिराळ्या राज्यांतील, निरनिराळ्या क्षेत्रांतील आणि निरनिराळ्या स्तरांवरील विचारवंत परात्पर गुरूंच्या निष्काम अलिप्तपणातून जोडले गेले आहेत.

हिंदु राष्ट्रासोबतच वैज्ञानिक कारणमीमांसेसह अध्यात्म हा एक अनोखा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून परात्पर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे माझ्यासारखा रूढ अर्थाने धार्मिक नसलेलासुद्धा सनातन संस्थेच्या कार्यक्रमामध्ये हिरीरीने भाग घेत आहे. यापुढेही माझे माझ्या परीने यात योगदान रहाणारच !’

(टीप : लिखाण पूर्वीचे असल्यामुळे लिखाणात ‘सच्चिदानंद परब्र्रह्म डॉ. आठवले’ असा उल्लेख न करता ‘परात्पर गुरु डॉ. आठवले’ असा उल्लेख केला आहे. – पू. सुधाकर चपळगावकर)

– (पू.) निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर, संभाजीनगर (१८.६.२०२२)

(समाप्त)