‘साधकांमध्ये आंतरिक पालट होऊन त्यांची साधना व्हावी’, असा ध्यास असलेले सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६० वर्षे) !

२.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल षष्ठी) या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने…

२.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल षष्ठी) या दिवशी देवद पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे यांचा ६० वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने २.९.२०२२ या दिवशी आपण त्यांच्या पत्नी सौ. मीनल राजेंद्र शिंदे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज देवद येथील श्री. शंकर नरुटे यांना सद्गुरु राजेंद्रदादा यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/609516.html

सद्गुरु राजेंद्र शिंदे

सद्गुरु दादा देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. सद्गुरु दादांचा संकल्प आणि त्यांच्या वाणीतील चैतन्य यांमुळे देवद आश्रमातील साधकांमध्ये पालट होऊ लागले आहेत. सद्गुरु दादा घेत असलेल्या आढाव्याविषयी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. शंकर नरुटे

१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी दिलेले दृष्टीकोन साधकांच्या अंतर्मनापर्यंत गेल्याने साधकांचे साधनेचे प्रयत्न आपोआप चालू होणे

सद्गुरु राजेंद्रदादा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात जे दृष्टीकोन देतात, ते साधकांच्या अंतर्मनापर्यंत जातात. त्यामुळे साधकांची आंतरिक विचारप्रक्रिया आपोआप चालू होते किंवा त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होतात. ‘हे कसे झाले ?’, हे साधकांच्या लक्षातही येत नाही.

२. सद्गुरु दादांच्या चैतन्ययुक्त विचारांमुळे साधकांचे स्वभावदोष आणि अहं न्यून होणे

सद्गुरु दादांच्या चैतन्ययुक्त विचारांमुळे ‘साधकांच्या अहंची तीव्रता हळूहळू कशी न्यून होते ?’, हे साधकांच्या लक्षातही येत नाही. ‘जेव्हा साधक मागे वळून बघतो, तेव्हा त्याला आपल्या अहंची तीव्रता किती होती आणि ती किती न्यून झाली ?’, याची जाणीव होते.

३. सद्गुरु राजेंद्रदादा साधकांना घडवण्यासाठी त्यांना ध्येय देतात आणि ‘साधकांनी ते ध्येय गाठावे’, यासाठी ते चिकाटीने अन् सातत्याने साधकांकडून प्रयत्न करून घेतात.

४. साधकांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव निर्माण करून त्यांना साधनेसाठी स्फूर्ती देणारे सद्गुरु राजेंद्रदादा !

सद्गुरु राजेंद्रदादांचा ‘परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असणारा भाव आणि त्यांना असलेली गुरुकार्याची तीव्र तळमळ’, यांमुळे त्यांना साधकांना घडवण्याचा ध्यास लागला आहे. सद्गुरु दादा साधकांना निरनिराळी उदाहरणे देऊन ‘आपले गुरु किती महान आहेत ! ते साधकांसाठी कशा प्रकारे आणि किती प्रयत्न करतात !’, हे सांगतात. सद्गुरु दादा साधकांमध्ये भाव आणि साधनेसाठी स्फूर्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे साधक अधिक उत्साहाने प्रयत्न करतात.

५. ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तीव्र आंतरिक तळमळ असणे

सद्गुरु राजेंद्रदादांना ‘साधकांची साधना व्हावी’, अशी पुष्कळ आंतरिक तळमळ आहे. ‘त्यांची ही तळमळ विचारांच्या माध्यमातून साधकांमध्ये कार्यरत होते’, असे मला वाटते. त्यांच्या मनात साधकाला पुढे नेण्याच्या दृष्टीने येणारे विचार साधकाच्या मनात कार्यरत होतात आणि ते विचार त्या साधकाला गतीने पुढे नेतात आणि त्यामुळे साधकांना ‘आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे ?’, याची जाणीव क्षणोक्षणी रहाते.

६. सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेला आढावा म्हणजे त्यांच्या अंतरातून निर्माण होणारा एक ऊर्जास्रोत आहे. त्यामुळे साधकांची साधनेविषयीची आंतरिक तळमळ आणि भावभक्ती वाढते.’

– श्री. शंकर नरुटे (आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.४.२०२१)