(म्हणे) ‘गोव्यात राष्ट्रीय ख्रिश्‍चन विद्यापिठाची स्थापना करा !’ – तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो यांची राज्यसभेत मागणी

मडगाव, २२ जुलै (वार्ता.) – गोव्यात राष्ट्रीय ख्रिश्‍चन विद्यापिठाची स्थापना करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसचे गोव्यातील खासदार लुईझिन फालेरो यांनी राज्यसभेत केली. तथापि संसदेचे अधिवेशन स्थगित झाल्याने या विषयावर अधिवेशनात चर्चा होऊ शकली नाही.

खासदार फालेरो म्हणाले,

१. उच्च शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून संस्कृती, लिपी आणि भाषा यांच्या संवर्धनासाठी भारतात ख्रिश्‍चन विद्यापिठाची आवश्यकता आहे. (सुशिक्षित लोकांपैकी बहुतांश लोक इंग्रजाळलेले, म्हणजे पाश्‍चात्त्य पद्धतीने आचरण करत आहेत, शिक्षण क्षेत्रात उच्चशिक्षणही इंग्रजी भाषेतून आहे, प्रशासकीय आणि न्यायव्यवस्थेचे कामकाजही इंग्रजी भाषेतून चालते. असे असतांना फालेरो यांना ख्र्रिश्‍चन विद्यापीठ स्थापन करून आणखी कोणती संस्कृती, लिपी आणि भाषा यांचे संवर्धन करायचे आहे ? – संपादक)

२. ‘ख्रिश्‍चन भारतीय राष्ट्रवाद’ निर्माण करण्यासाठी आणि खिस्ती नैतिक मूल्ये अन् संस्कृती यांचे शिक्षण देण्यासाठी या विद्यापिठाची आवश्यकता आहे. (गोव्यात चर्चशी संबंधित ‘डायोसेसन संस्थे’च्या १३५ शैक्षणिक संस्था अस्तित्वात आहेत. या शाळा मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण द्यायला सिद्ध नाहीत. या ठिकाणी ख्रिस्ती संस्कृतीच जपली जाते आणि त्यांपैकी काही शाळांमध्ये शिकणार्‍या हिंदु विद्यार्थिनींना टिकली लावणे, बांगड्या घालणे आदींवर बंदी घातली जाते ! यासह बरेली (उत्तरप्रदेश) येथील ख्रिस्ती मिशनरी शाळेने शीख विद्यार्थ्यांना पगडी, कृपाण, कडे न घालण्याचा आदेश दिला आहे, याविषयी फालेरो काही बोलतील का ? – संपादक)

३. शिक्षणाच्या दृष्टीने गोवा हे महत्त्वाचे ठिकाण असल्याने आणि इतर ठिकाणच्या तुलनेत गोव्यात ख्रिस्ती लोकसंख्या अधिक असल्याने गोव्यात हे विद्यापीठ स्थापन करावे. ख्रिस्ती विद्यापीठ स्थापन केल्याने लोकांना स्वतंत्रपणे विचार करून त्यानुसार कृतीशील होण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण मिळेल आणि सामाजिक विकास साधता येईल. (सध्या अस्तित्वात असलेली विद्यापिठे धर्मनिरपेक्ष आहेत. ख्रिस्ती विद्यापीठ स्थापन करून फालेरो यांना ख्रिस्त्यांमध्ये धर्मांधता निर्माण करून ती जोपासायची आहे का ? – संपादक)

४. ख्रिस्ती विद्यापिठामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावला जाईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिस्त आणण्यास साहाय्य होईल. (याचा अर्थ ‘सध्याच्या भारतातील विद्यापिठांत दिले जाणारे शिक्षण उच्च दर्जाचे नाही’, असे फालेरो यांना सुचवायचे आहे का ? – संपादक)

५. सनदी सेवेमध्ये मोजकेच ख्रिस्ती लोक काम करत आहेत. (याचे कारण गोव्यातील बहुतांश ख्रिस्ती किंवा दक्षिण गोव्यातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती आखाती देशांत किंवा युरोपमध्ये नोकरी करतो, हेही आहे ! – संपादक) राष्ट्रीय ख्रिश्‍चन विद्यापिठाची स्थापना झाल्याने नवीन विद्यार्थी निर्माण होतील आणि ते व्यवस्थापन चांगल्या तर्‍हेने हाताळतील. (असे म्हणणे हे सध्याच्या विद्यापिठांतून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना न्यून लेखणे होय ! – संपादक)

६. राष्ट्रीय ख्रिश्‍चन विद्यापीठ ख्रिस्ती डॉक्टर, अधिवक्ता, सुनियोजन करणार्‍या व्यक्ती, सामाजिक वैज्ञानिक, व्यवस्थापक, योजना आखणारे आणि नागरिक यांची राष्ट्र उभारणीसाठी एक फळी निर्माण करू शकणार आहे. राज्यघटनेने कलम २९ आणि ३० यांनुसार अल्पसंख्यांकांना संस्कृती आणि शिक्षण संवर्धन यांचा अधिकार दिलेला आहे.’’ (याचाच लाभ उठवून गोव्यातील ‘डायोसेसन’च्या ख्रिस्ती शाळा शासनावर दबाव आणून मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण न देताही सरकारी अनुदान लाटत आहेत ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनी विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याची केवळ मागणी केली, तरी ‘शिक्षणाचे भगवेकरण केले जात आहे’, अशी ओरड करणारे पुरो(अधो)गामी, काँग्रेसवाले, साम्यवादी आता ‘शिक्षणाचे ख्रिस्तीकरण केले जात आहे’, असे म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • धर्माच्या आधारावर स्वतंत्र विद्यापिठाची मागणी केली जात असतांना धर्मनिरपेक्षतावाले गप्प का ?
  • गोव्यात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराचा इतिहास पाहिल्यास हे विद्यापीठही हिंदूंच्या धर्मांतराचे केंद्र बनणार नाही कशावरून ?