पंजाबमध्ये शिखांचे वाढते धर्मांतर !

  • अमृतसर आणि गुरदासपूर जिल्ह्यांत ७०० चर्च !

  • राज्यातील १२ सहस्रांपैकी ८ सहस्र गावांमध्ये ख्रिस्त्यांच्या धार्मिक समित्या कार्यरत !

चंडीगड – पंजाबच्या पाक सीमेवरील बटाला, गुरदासपूर, जालंधर, लुधियाना, फतेहगढ चूडिया, डेरा बाबा नानक, मजीठा, अजनाला आणि अमृतसर या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारक मोठ्या प्रमाणात शिखांचे धर्मांतर करत आहेत. याविषयी शिखांचे धार्मिक पीठ असलेल्या अकाल तख्तचे जत्थेदार (प्रमुख) ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी आरोप केला की, या गावांमध्ये ख्रिस्ती धर्मप्रचारक शिखांना पैशांचे आमीष दाखवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करत आहेत. हे शीख धर्मावरील आक्रमण आहे. हे आम्ही सहन करणार नाही.

१. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीकडे या संदर्भात अनेक तक्रारीही आल्या असून या कमेटीने या घटनांना गांभीर्याने घेतले आहे. या कमेटीने समिती नेमून गावागावांत जाऊन शिखांमध्ये जागृती चालू केली आहे.

२. ‘युनायटेड क्रिश्‍चियन फ्रंट’च्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये १२ सहस्र गावांपैकी ८ सहस्र गावांमध्ये ख्रिस्त्यांनी धार्मिक समित्या स्थापन केल्या आहेत. अमृतसर आणि गुरदासपूर जिल्ह्यांमध्ये ख्रिस्त्यांचे ६०० ते ७०० चर्च आहेत. यांतील ७० टक्के चर्च गेल्या ५ वर्षांत बांधण्यात आले आहेत.

३. ख्रिस्त्यांकडून शिखांचे धर्मांतर करण्यात आल्यावर त्यांचे रहाणीमान आणि वेशभूषा यांत कोणताही पालट करण्यास सांगितला जात नाही. त्यामुळे ‘ते ख्रिस्ती झाले आहेत’, हे लक्षात येत नाही. केवळ आडनावापुढे ‘मसीह’ असा शब्द लावला जात आहे. या धर्मांतरितांमध्ये बहुसंख्येने दलित आहेत; मात्र अधिकृत धर्मांतर झाल्याचे दाखवण्यात न आल्याने त्यांना दलितांना मिळणार्‍या सर्व सुविधा मिळत आहेत.

संपादकीय भूमिका

‘केंद्र सरकार धर्मांतरविरोधी कायदा कधी करणार ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात सतत निर्माण होत आहे !