पाक सैन्य आणि आतंकवादी संघटना टीटीपी यांच्यात संघर्ष विराम

  • पाक टीटीपीच्या आतंकवाद्यांची सुटका करणार

  • अफगाण सीमेवरील एका भागातून सैन्य मागे घेणार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानी सैन्य आणि आतंकवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांच्यात तालिबानने मध्यस्थी करून स्थायी संघर्ष विराम घडवून आणला आहे. या अंतर्गत पाकिस्तानी सैन्य टीटीपीच्या आतंकवाद्यांची सुटका करणार असून त्यांच्यावरील खटले मागे घेण्यात येणार आहे. तसेच अफगाण सीमेवरील एका भागातून पाकचे सहस्रो सैन्य हटवण्यात येणार आहे. अन्य एका अटीनुसार पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मलकंद भागामध्ये शरीयत कायदा लागू करण्यात येणार आहे. पाक सैन्याकडून करण्यात आलेल्या या संघर्ष विरामातील अटींचा पाकच्या नागरिकांकडून विरोध होत आहे. वर्ष २०१४ मध्ये पेशावर येथे एका सैनिकी शाळेत टीटीपीने केलेल्या आतंकवादी आक्रमणात १३२ हून अधिक मुले ठार झाली होती. या मुलांच्या पालकांकडून पाक सैन्याच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे. दुसरीकडे पाक सैन्याच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, गेली १४ वर्षे चालू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे.

संपादकीय भूमिका

पाकने या संघर्ष विरामानंतर टीटीपीच्या आतंकवाद्यांचा वापर भारतविरोधी कारवाया करण्यासाठी वापरल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !