मुंबई महापालिकेकडून बंदी घातलेले प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून ५ कोटी रुपयांचा दंड वसूल !

मुंबई – बंदी घातलेले प्लास्टिक वापरणाऱ्यांवर मुंबई महापालिकेने कारवाई करून त्यांच्याकडून ५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. वर्ष २०१८ पासून अद्यापपर्यंतच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत बंदी असलेले २ लाख किलो प्लास्टिक कह्यात घेण्यात आले आहे. (उत्पादकांवरच कठोर कारवाई का करत नाहीत ? – संपादक) त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा परिपत्रक काढून ‘बंदी असलेले प्लास्टिक वापरू नये’, असे आवाहन केले आहे. अशा प्लास्टिकचा वापर करून पिशव्या आणि अन्य उत्पादने सिद्ध करणारे उत्पादक, व्यावसायिक, ग्राहक यांनी पहिल्यांदा आदेशाचे उल्लंघन केले, तर ५ सहस्र रुपये दंड आणि दुसऱ्यांदा उल्लंघन केले, तर २५ सहस्र रुपये दंड आणि ३ मासांचा कारावास, अशी कारवाई करण्यात येणार आहे.