‘स्मार्टफोन’ आत्महत्येसाठी कारणीभूत ठरत आहे ! – संशोधन

ऑस्टिन (अमेरिका) – ‘स्मार्टफोन’च्या संदर्भात (भ्रमणभाषाच्या संदर्भात) एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ‘सॅपियन लॅब्स’कडून करण्यात आलेल्या संशोधनानुसार १८ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांच्या बिघडत्या मानसिक आरोग्यामागे ‘स्मार्टफोन’ असू शकतो. जेव्हा इंटरनेटचा उपयोग होत नव्हता, त्यावेळी १८ वर्षांपर्यंतचे तरुण त्यांचे मित्र आणि कुटुंबीय यांच्यासमवेत १५ ते १८ सहस्र घंटे घालवत. आता ही वेळ न्यून होऊन ५ सहस्र घंट्यांवर आली आहे. अहवालात पुढे म्हणण्यात आले आहे की, जे लोक स्मार्टफोनचा अधिक वापर करतात, त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येतात.

प्रमुख संशोधक तारा थिआगराजन यांनी सांगितले की, ‘स्मार्टफोन’चा वापर इतका वाढला आहे की, लोक आपापसांत बोलणेच विसरले आहेत. ज्या वेळी लोक एकमेकांना भेटत नाहीत, त्या वेळी ते एखाद्या व्यक्तीच्या तोंडवळ्यावरील भाव, शरिराची हालचाल आणि लोकांच्या भावनांवर लक्ष देण्यात, तसेच आयुष्यातील समस्या सोडवण्यास सक्षम नसतात. यामुळे ते समाजाशी जोडले जाऊ शकत नाहीत आणि त्यांच्या मनात आत्महत्येसारखे टोकाचे विचार येतात.

या संशोधनामध्ये एकूण ३४ देशांतील माहिती एकत्र करण्यात आली. स्मार्टफोनवर लोकांनी अवलंबून रहाण्याला वर्ष २०१० पासून आरंभ झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

संपादकीय भुमिका

आधुनिक विज्ञानाच्या अतिरेकाचे दुष्परिणाम ! जे विज्ञान मनुष्याला सोयी उपलब्ध करून त्याचे जीवन सुसह्य करण्यासाठी निर्मिले गेले, तेच मनुष्याच्या अंतास कारणीभूत ठरत आहे ! विज्ञानाचा हा सपशेल पराभव असून विज्ञानाचा उदोउदो करणारे हे लक्षात घेतील का ?