राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा सहस्रो बंदीवान अधिक !

नागपूर – राज्यातील बंदीवानांनी तुडुंब भरलेल्या कारागृहांत जवळपास १३ सहस्र बंदीवान क्षमतेपेक्षा अधिक आहेत, अशी माहिती समोर आली आहे. मध्यवर्ती कारागृहे आणि जिल्हा कारागृहे यांमध्ये दुपटीपेक्षा अधिक बंदीवानांची संख्या आहे. यात ७५ टक्के न्यायाधीन (कच्चे), तर २५ टक्के सिद्धदोष (शिक्षा झालेले) बंदीवान आहेत.

१. महाराष्ट्र कारागृह विभागात ९ मध्यवर्ती कारागृहे, २८ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे, १ खुली वसाहत आणि १७२ दुय्यम कारागृहे यांचा समावेश होतो. पुणे आणि मुंबई येथे महिलांसाठी स्वतंत्र कारागृहे आहेत. पुणे आणि अकोला येथे महिलांसाठी खुले कारागृहे आहेत.

२. राज्यातील ६० कारागृहांतील अधिकृत बंदीवानांची संख्या २४ सहस्र ७२२ इतकी आहे. प्रत्यक्ष बंदीवानांची संख्या ३७ सहस्र ८५० आहे. यामध्ये सिद्धदोष बंदीवानांची संख्या ५ सहस्र ८ आणि न्यायाधीन बंदीवानांची संख्या ३२ सहस्र ५५९ आहे. २८३ बंदीवान स्थानबद्ध आहेत.

३. तात्पुरती उपाययोजना करून बराकींमध्ये बंदीवानांना ठेवले जाते; पण एकाच ठिकाणी गर्दी होत असल्याने त्यांचे व्यवस्थापन करणे कठीण झाले आहे. अनेक दिवसांपासून त्यावर तोडगाच निघाला नाही.

संपादकीय भूमिका 

  • बंदीवानांची वाढती संख्या ही स्थिती महाराष्ट्रासाठी लज्जास्पद !
  • बंदीवानांच्या अधिक संख्येमुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.  कारागृहांच्या या दयनीय स्थितीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची संख्या का वाढवत नाही ? 
  • वाढत्या बंदीवानांची संख्या लक्षात घेता राज्यातील गुन्हेगारीलाही आळा घालण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत !