भारत हिंदु राष्ट्र घोषित झाला, तर वर्षभरात १५ देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती  

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

नवी देहली, ७ मे (वार्ता.) – भारत जर स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करेल, तर एका वर्षाच्या आत अन्य १५ देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील, असे प्रतिपादन पुरी येथील पुर्वाम्नाय गोवर्धन पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे केले. ‘आम्ही लाठी, बंदुकीची गोळी आणि बाँब यांच्या आधारावर नाही, तर प्रेम, सिद्धांत, वस्तूस्थिती आणि इतिहास यांच्या आधारावर संपूर्ण आशिया खंडाला ‘हिंदुमहाद्वीप’ म्हणून घोषित करू इच्छितो’, असेही शंकराचार्य म्हणाले. ते येथील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनात बोलत होते.

या वेळी केंद्रीय मंत्री श्री. अश्‍विनी चौबे, विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता अलोक कुमार, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, ‘पंजाब केसरी’ वृत्तपत्राच्या संचालिका किरण शर्मा, ‘सुदर्शन’ वाहिनीचे प्रमुख श्री. सुरेश चव्हाणके, गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी.एस्. राणा आदी मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये शंकराचार्यांनी ‘यापूर्वी प्रक्षोभक विधान केली आहेत आणि त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले  आहे’, असे म्हटले आहे. यावर येत्या ९ मे या दिवशी सुनावणी होणार आहे.

शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती यांनी अधिवेशनात मांडलेले विचार
भारताच्या दुर्बल व्यवहारामुळे आम्हाला हीनतेचा अनुभव येतो ! – विदेशातील हिंदू  

कोरोना काळात ७० से ७५ देशांशी आमचा संपर्क झाला. विश्‍वातील २०४ प्रतिनिधींचे विचार आम्ही जाणून घेतले. मॉरिशस आणि अन्य देशांतील हिंदूंनी त्यांची व्यथा मांडली. ते म्हणाले, ‘भारताच्या दुर्बल व्यवहारामुळे आम्हाला हीनतेचा अनुभव येत आहे.’

केवळ ७२ वर्षांच्या असलेल्या राज्यघटनेद्वारे आम्हाला भीती दाखवू नये !

सगळ्यांचे पूर्वज वैदिक सनातनी आर्य हिंदू होते. राज्यघटना, अधिवक्ता आणि न्यायाधीश यांना दिशादर्शन करण्याचे दायित्व शंकराचार्यांचे असते आणि हा आमचा शाश्‍वत अधिकार आहे. वर्तमानामध्ये देशात लागू असलेली राज्यघटना ७५ वर्षांपासून आहे. आमची राज्यघटना १ अब्ज ९७ कोटी २९ लाख ४९ सहस्र १२२ वर्षांची आहे. ७२ वर्षांच्या असलेल्या राज्यघटनेच्या आधारे आम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न कुणी करू नये.

मंत्रीमंडळासाठी आवश्यक व्यक्ती !

मंत्रीमंडळ योग्य पद्धतीने चालवायचे असेल, तर त्यामध्ये ४ ब्राह्मण, ८ क्षत्रिय, २१ वैश्य, ३ शुद्र आणि १ सुत अर्थ असण्याची आवश्यकता आहे. भारतात जी राजेशाही  होती तीच खर्‍या अर्थाने लोकशाही होती. विश्‍वस्तरावर विकास आणि राजकारण यांची व्याख्या करण्याची आवश्यकता आहे. राजकारणासाठी राजधर्म, क्षात्रधर्म, अर्थानीती, दंडनीती या शब्दांचा प्रयोग महाभारत, अर्थपुराण आणि मनुस्मृति यांमध्ये केला गेला आहे.

येशू ख्रिस्त भारतात १० वर्षे राहिले होते !

येशू ख्रिस्त भारतात १० वर्षे राहिला होता. ३ वर्षे तो जगन्नाथ पुरी येथे राहून त्याने तत्कालीन शंकराचार्यांकडून शिक्षण घेतले. रोममध्ये त्याची जी प्रतिमा लावण्यात आली आहे, त्याला वैष्णव पद्धतीने टिळा लावलेला आहे. येशूच्या मार्गावर कुणी ख्रिस्ती चालत आहे का ? येशू गोरक्षणाचा समर्थक होता. त्यामुळे येशू याला व्यवस्थित समजून घेऊन त्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा.