मीरा-भाईंदर महापालिकेच्या मैदानावर नमाजपठणासाठीची अनुमती रहित !

कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांकडूनही निवेदन !

मुंबई, २ मे (वार्ता.) – मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर रमजान ईदच्या दिवशी नमाजपठणासाठी अनुमती दिली होती; मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था याविषयी प्रश्न उपस्थित केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने अनुमती रहित केली. ईदच्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर नमाजपठणासाठी अनुमती मिळावी, यासाठी आसिफ शेख यांनी महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. महानगरपालिकेने यासाठी अनुमती दिली; मात्र मागील १० वर्षांचा इतिहास पहाता या मैदानावर नमाजपठण झाल्याची नोंद नाही, तसेच पोलिसांनीही कायदा आणि सुव्यवस्था यांच्या कारणास्तव ही अनुमती रहित करण्यासाठी निवेदन दिले. त्यामुळे मैदानावर नमाजपठणासाठी दिलेली अनुमती रहित करण्यात येत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने मीरा भाईंदर, वसई-विरार पोलीस उपायुक्तांना पत्राद्वारे कळवले आहे.

पोलिसांची कृती अभिनंदनीय ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल

याविषयी हिंदू टास्क फोर्सचे संस्थापक अध्यक्ष अधिवक्ता खुश खंडेलवाल म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हे क्रिकेटचे मैदान आहे. या मैदानावर कोणताही धार्मिक कार्यक्रम घेण्यात येऊ नये, असा महानगरपालिकेचा ठराव आहे. त्यामुळे पोलिसांनी याची नोंद घेऊन केलेली कृती ही अभिनंदनीय आहे.