तीव्र शारीरिक त्रासातही भावस्थितीत रहाणार्‍या आणि गुरुकार्याविषयी प्रचंड तळमळ असलेल्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील सौ. मनीषा पाठक (वय ४० वर्षे) !

सौ. मनीषा पाठक यांना ४० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

माघ कृष्ण पक्ष नवमी, दासनवमी (२५.२.२०२२) या दिवशी सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांचा ४० वा वाढदिवस आहे. ६.१२.२०२१ या दिवशी सौ. मनीषा पाठक उपचारांसाठी देवद आश्रमात आल्या. त्यांना तीव्र शारीरिक त्रास आहे. इतक्या तीव्र शारीरिक त्रासातही त्या अखंड साधनारत असतात. माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये वाढदिवसानिमित्त येथे देत आहे.

सौ. मनीषा पाठक

१. आनंदी

‘सौ. मनीषाताईंना तीव्र शारीरिक त्रास असूनही त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यास ‘त्यांना वेदना होत आहेत’, असे जाणवत नाही. त्या पुष्कळ आनंदी असतात.

२. इतरांचा विचार करणे

एकदा त्या रात्री आश्रमात उशिरा आल्या. चारचाकीतून सर्व साहित्य काढून झाल्यावर त्या खोलीत जात असतांना त्यांना एकेक पाऊल उचलणे पुष्कळ कष्टदायक होत होते. त्यांची खोली वरच्या माळ्यावर असल्यामुळे त्यांना आसंदीत बसवून वरच्या मजल्यावर घेऊन जाण्यासाठी साधक थांबले होते; परंतु ‘साधकांना त्रास व्हायला नको’; म्हणून त्यांनी सांगितले, ‘‘मी जिना चढते. मी जाऊ शकते.’’ ‘आपल्यामुळे इतरांना त्रास नको’, असा विचार करून त्यांनी आसंदीमध्ये बसून जाण्याचे टाळले’, असे मला जाणवले.

त्यांना अत्यंत वेदना होत असतांनाही त्या इतरांचा इतका विचार करतात, हे पाहून मी थक्क झाले. ‘गुरुदेवांनी कसे साधक घडवले आहेत !’, असा विचार मनात येऊन माझी गुरुदेव आणि मनीषाताई यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

३. भौतिक वस्तूंविषयी आसक्ती नसणे

मी मनीषाताईंना अनेक वर्षांपासून ओळखते. त्या नुकत्याच साधनेत आल्या होत्या, तेव्हा मी त्यांच्या घरी गेले होते. त्या वेळी त्यांच्या घरी मोजकेच ‘फर्निचर’ होते. त्या वेळी ते दोघेही (श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि सौ. मनीषाताई) चांगल्या वेतनाची नोकरी करत असूनही आणि त्यांनी काही काळ विदेशात वास्तव्य केलेले असूनही त्यांना भौतिक वस्तूंविषयी आसक्ती नाही. ‘त्यांनी घरात कोणतेही अनावश्यक साहित्य ठेवले नव्हते’, हे पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले. यातून ‘कोणतीही प्रतिमा न जपता अनासक्त राहून कसे वागायला हवे ?’, हे मला शिकायला मिळाले.

४. गुरुकार्याची तळमळ

माझा मनीषाताईंशी सेवेनिमित्त संपर्क असतो. त्यांना कधीही ‘व्हॉट्सॲप’वर संदेश पाठवला, तर त्या काही मिनिटांतच उत्तर पाठवतात. त्यांना अनेक व्याधी असल्यामुळे त्या झोपून असतात. अशा स्थितीतही त्यांची तत्परता पाहून ‘त्यांना गुरुकार्याची किती तळमळ आहे !’, हे लक्षात येते.

५. कृतज्ञताभाव

अ. एकदा मनीषाताईंना रात्री ११ वाजल्यानंतर त्रास चालू होऊन त्यांच्या छातीत पुष्कळ दुखत होते. मी आणि आश्रमातील आधुनिक वैद्य (डॉ.) मंगलकुमार कुलकर्णी त्यांना पहायला गेलो होतो. तेव्हा ‘आम्हाला त्यांच्यासाठी रात्री झोपेतून उठून यावे लागले’, याचे मनीषाताईंना पुष्कळ वाईट वाटत होते. त्या सतत गुरुदेव आणि आम्ही दोघे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत होत्या. स्वतःला तीव्र त्रास होत असतांना साहाय्य करायला आलेल्या वैद्यांप्रती त्या सतत कृतज्ञता व्यक्त करतांना पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले.

आ. त्यांना तरुण वयातच पुष्कळ शारीरिक त्रास असूनही त्यांच्या मुखात सतत गुरुदेवांचे नाव असते आणि ‘‘ते आपल्यासाठी किती करतात !’’, असेच त्या म्हणत असतात. या एका विचाराने त्यांचा कृतज्ञताभाव सतत दाटून येतो. त्या स्वतःला होत असलेल्या त्रासाबद्दल कधीच गार्‍हाणे
करत नाहीत.

६. कृतज्ञता

मनीषाताई देवद आश्रमात आल्यामुळे मला त्यांना जवळून अनुभवता आले. ‘तीव्र शारीरिक त्रास असतांना गुरुकार्याची प्रचंड तळमळ असलेल्या आणि भावस्थितीत रहाणार्‍या मनीषाताई एकमेवाद्वितीय आहेत’, असेच म्हणावे लागेल. गुरुदेवांनी मनीषाताईंमधील अनेक गुण मला जवळून पहायला दिले, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘मनीषाताईंचे गुण आम्हा सर्व साधकांमध्ये येवोत’, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, देवद आश्रम, पनवेल. (१९.२.२०२२)

‘नम्रता, लीनता आणि भावावस्था’ हा आहे मनीषाताईंचा स्थायीभाव ।

वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील

तीव्र शारीरिक त्रासांतही त्रासाला न कवटाळता आनंदी रहातात ।
अन् समष्टी साधनेसाठी तळमळीने अविरत सेवा करतात ।। १ ।।

‘नम्रता, लीनता आणि भावावस्था’ हा आहे त्यांचा स्थायीभाव ।
‘गुरुसेवा’ हाच त्यांचा श्वास अन् हेच त्यांचे ध्येय ।। २ ।।

प्रत्येक श्वासासह गुरुदेवांचे स्मरण करतात ।
स्वतः भावस्थितीत राहून इतरांचा भाव त्या जागृत करतात ।। ३ ।।

परिस्थितीला दोष न देता त्यावर क्षात्रभावाने मात करतात ।
त्रास होत असतांनाही नम्रतेने आणि आनंदाने प्रतिसाद देतात ।। ४ ।।

‘मनीषाताईंची जलद आध्यात्मिक उन्नती होवो’ ।
हीच गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना ।। ५ ।।

– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील (१९.२.२०२२)

‘प.पू. गुरुदेवांची चरणप्राप्ती’ हाच जिचा ध्यास ।

सौ. ज्योती दाते

सनातनच्या वृक्षवल्लीवर उगवले एक सुमन ।
साधनेसाठीच तिने अर्पित केले आपुले जीवन ।। १ ।।

‘तळमळ, श्रद्धा, भाव अन् भक्ती’ हे जिचे साज ।
‘प.पू. गुरुदेवांची (टीप १) चरणप्राप्ती’ हाच जिचा ध्यास ।। २ ।।

कपडे, अलंकार, खाणे-पिणे, नसे कशाचीच आसक्ती ।
‘केवळ आणि केवळ श्री गुरुचरण’ हीच जिची भक्ती ।। ३ ।।

असे हे सुंदर फूल ज्याच्या सान्निध्यात आले ।
त्या प्रत्येकाचे मन सुगंधित झाले ।। ४ ।।

हे परमेश्वरा, सर्व साधकांची एकच मनीषा ।
सौ. मनीषाताई होऊ दे आरूढ संतपदी आता ।। ५ ।।

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले

– सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.२.२०२२)