३ कोटी तरुणांना रोजगार, तर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना विनामूल्य स्कूटी (दुचाकी) देणार !

उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी भाजपचे घोषणापत्र प्रसिद्ध

जनतेला अशा प्रकारे विनामूल्य वस्तू देण्याचे आश्‍वासन देणे, म्हणजे मतांसाठी लाच देणेच होय ! अशी आश्‍वासने देणारे सर्व राजकीय पक्ष लोकशाहीला अपकीर्तच करत आहेत !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपकडून घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. भाजपने याला ‘लोक कल्याण संकल्प पत्र’ म्हटले आहे. यात ३ कोटी तरुणांना रोजगार, तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना विनामूल्य स्कूटी (दुचाकी) देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

यासह शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने विविध पावले उचलणे, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत होळी आणि दिवाळी या काळात विनामूल्य २ सिलिंडर देणे, पुढील ५ वर्षांत सर्व शेतकर्‍यांना सिंचनासाठी विनामूल्य वीज देणे, ५ सहस्र कोटी रुपये खर्चाची ‘मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना’ चालू करून याद्वारे अल्प अन् अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना कूपनलिका, तलाव, टाक्या इत्यादी बांधकामासाठी अनुदान देणे आदी आश्‍वासनेही भाजपने दिली आहेत.