कोरोनाची लस बंधनकारक नाही; मात्र नागरिकांना विनंती करून लस घेण्यास भाग पाडू ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना – राज्यात कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. राज्यात लसीकरण समाधानकारक असून लसीची सक्ती नसली, तरी आम्ही नागरिकांना लस घेण्याविषयी विनंती करू, तसेच त्यांना लस घेण्यास भाग पाडू, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २३ जानेवारी या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील शाळा चालू होत असल्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडीही लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी करून घ्यावी आणि ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला, तो वर्ग बंद ठेवावा, अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.

‘लोकल सर्कल कम्युनिटी प्लॅटफॉर्म’ने एक सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणात ६२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. यावर राजेश टोपे म्हणाले की, पालकांनी काळजी करण्याचे कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होऊ नये, असाही शाळा चालू करण्याचा हेतू आहे. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावेत, असे आवाहन त्यांनी केले.