सरकारच्या प्रभाग संख्या वाढवण्याच्या निर्णयाविरोधातील भाजपच्या नगरसेवकांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या वाढवण्याच्या निर्णयाविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी प्रविष्ट केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुंबई शहराची वाढती लोकसंख्या पहाता मुंबई महापालिकेतील प्रभाग रचना आणि महापालिकेची सध्याची २२७ ही नगरसेवकांची संख्या ९ ने वाढवून २३६ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या विरोधात भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत आणि नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.

या याचिकेत त्यांनी नमूद केले होते की, वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग संख्या वाढवण्यात आली आहे. नोव्हेंबर २०११ मध्येच प्रभाग संख्या २२१ वरून २२७ करण्यात आली आहे. त्या वेळी मुंबईतील लोकसंख्येत ४ लाखांची वाढ नोंदवण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी जनगणना झालेली नसतांना पुन्हा त्याच धर्तीवर संख्या वाढवता येत नाही. तसेच मुंबईची लोकसंख्या कोरोनाच्या काळात अल्प झालेली असू शकते. ती वाढलेलीच आहे, असा अंदाज बांधणे आणि त्यानुसार प्रभाग संख्या वाढवणे योग्य ठरणार नाही, असा याचिकाकर्त्यांनी दावा केला होता.