६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. श्रीवत्स विक्रम घोडके (वय २ वर्षे) !

बार्शी (सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीवत्स घोडके याचे आई-वडील श्री. विक्रम आणि सौ. स्वाती घोडके यांना आलेल्या अनुभूती आणि श्रीववत्सची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

कु. श्रीवत्स घोडके
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले 

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. गरोदरपण

१ अ. ‘पहिल्या ४ मासांत मला अल्प त्रास झाला. माझे मन आनंदी आणि उत्साही असायचे.

१ आ. सात्त्विक पदार्थ आवडणे : एरव्ही मी मसालेदार पदार्थ आवडीने खायचे; पण गरोदरपणी मला त्या पदार्थांकडे बघावेसेही वाटत नसे. मला ‘फळे खावी किंवा दूध प्यावे’, असे वाटायचे.

१ इ. ‘सतत सेवा करावी’, असे वाटणे आणि सेवा करतांना थकायला न होणे : मला सतत ‘पुष्कळ सेवा करावी’, असे वाटत होते. या काळामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा, अधिवेशन आणि शिबिर झाले. तेव्हा मला सेवा करूनही दमायला होत नव्हते. तेव्हा मला सतत उत्साह वाटायचा.’

– सौ. स्वाती विक्रम घोडके (आई), बार्शी, जिल्हा सोलापूर

१ ई. पत्नीच्या रक्तातील ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण अल्प असतांना तिला गर्भधारणा झाल्याने ताण येणे : ‘पत्नीच्या रक्तातील ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण ५ ग्रॅम प्रती लिटर एवढे अल्प झाले होते. (‘महिलांमध्ये रक्तातील ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण १२ ते १५.५ ग्रॅम प्रती लिटर, एवढे असणे आवश्यक आहे.’ – संकलक) असे असतांना तिला गर्भधारणा झाल्याने मला फार ताण आला आणि भीतीही वाटली. याविषयी मी एका स्त्रीरोग तज्ञ असलेल्या माझ्या मित्राचा समादेश घेतला. मी पूर्वी प्रयोगशाळा तंत्रज्ञ असल्याने माझा अशा रुग्णांचा अभ्यास होता. ‘औषधोपचार केल्यावरही त्यांच्यात विशेष प्रगती होत नाही’, हे मला ठाऊक होते. मी पत्नीवर उपचार चालू केले; पण माझ्या मनात अनेक विचार येत होते.

१ ई १. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी ‘सर्वकाही छान होईल’, असे सांगून आश्वस्त करणे : शेवटी मी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना भ्रमणभाष करून सर्व स्थिती सांगितली. त्या मला म्हणाल्या, ‘‘किती आनंदाची गोष्ट आहे ! जे काही होते, ते देवाच्या इच्छेनेच होते. तुम्ही काही काळजी करू नका. सर्वकाही छान होईल. तुम्ही केवळ उपचार चालू करा आणि तुमच्या सेवेकडे लक्ष द्या.’’ त्या माझ्या पत्नीशीही बोलल्या आणि त्यांनी तिला ‘भावाच्या स्तरावर कोणते प्रयत्न करायचे ?’, हे सांगितले.

१ ई २. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी बोलणे झाल्यावर पत्नीच्या शरिरातील ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण ९ व्या मासापर्यंत सर्वसाधारण होणे : त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर सर्व परिस्थिती एकदम पालटली. पत्नीकडून उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि ९ व्या मासापर्यंत तिच्या शरिरातील ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण ११ ग्रॅम प्रती लिटर झाले. ‘असे होणे’, ही केवळ गुरुकृपाच होती.’ – श्री. विक्रम घोडके (वडील), बार्शी, जिल्हा सोलापूर.

सौ. स्वाती घोडके

१ उ. संतांचे लाभलेले मार्गदर्शन 

१ उ १. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी भावजागृतीचे छोटे छोटे प्रयोग शिकवणे : ‘मला आठवा मास चालू असतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे सोलापूरच्या सेवाकेंद्रात आले होते. तेव्हा त्यांनी साधकांना ‘दिवसभरात भावजागृतीचे छोटे छोटे प्रयोग कसे करायचे ?’, हे सांगितले. तेव्हा मला माझ्या पोटातील बाळाची हालचाल जाणवत होती.

१ उ २. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी आनंदी रहाण्यास सांगणे आणि साधनेविषयी मार्गदर्शन करणे : याच काळात मला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा सत्संग मिळाला. त्यांनी मला ‘मनाची स्थिती कशी ठेवायची ? आनंदी कसे रहायचे ? बाळावर संस्कार कसे करायचे ? बाळाला सूचनासत्र कसे शिकवायचे आणि मानसरित्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत कसे जायचे ?’, यांसारख्या पुष्कळ महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळे मला फार आनंद मिळाला. मला त्यांचा सत्संग २ वेळा मिळाला. तेव्हा ‘बाळामुळेच मला साक्षात् महालक्ष्मीमातेचा सत्संग मिळाला’, या विचाराने मला बाळाविषयी फार कृतज्ञता वाटली आणि ‘हे बाळ दैवी आहे’, असे वाटले.

२. बाळाचा जन्म ‘भगवंत जयंती’ला होणे : बाळाचा जन्म १६.५.२०१९ या दिवशी झाला. त्या दिवशी गुरुवार आणि ‘भगवंत जयंती’ होती. पूर्ण जगभरात केवळ बार्शीमध्येच एकमेव ‘भगवंत मंदिर’ आहे. त्यामुळे ‘हे सगळे ईश्वरी नियोजनच आहे’, असे वाटून मला फार कृतज्ञता वाटली.

२ अ. पत्नीच्या प्रसुतीच्या ३ मास आधी पडलेल्या स्वप्नात मुलगा झाल्याचे दिसणे आणि प्रत्यक्षातही स्वप्नातील बालकाप्रमाणे मुलगाच होणे : ‘आम्हा दोघांनाही मुलगी व्हावी’, असे वाटत होते. पत्नीच्या प्रसुतीच्या ३ मास आधी मला एक स्वप्न पडले होते. त्यात ‘मला एक तेजस्वी आणि हात-पाय लांब असलेला पुत्र झाला आहे’, असे दिसले. पत्नीची प्रसुती झाल्यावर तेथील परिचारिकेने बाळ माझ्याकडे आणून दिले. तेव्हा स्वप्नातील बालक आणि माझ्या हातातील बाळ एकच असल्याचे माझ्या लक्षात आले.’ – श्री. विक्रम घोडके

३. जन्म ते २ मास

३ अ. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी बाळाचे नाव ‘श्रीवत्स’ ठेवण्यास सांगणे : बाळाचा जन्म झाल्यानंतर अवघ्या काही घंट्यांतच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी ‘बाळाचे नाव ‘श्रीवत्स’ ठेवा’, असे सांगितले. तेव्हा ‘देवच बाळाचे सर्वकाही करत आहे’, असे मला वाटले.’

– सौ. स्वाती विक्रम घोडके

३ आ. ‘बाळ किती तेजस्वी आहे !’, असे म्हणून आधुनिक वैद्यांनी बाळाची छायाचित्रे काढणे : ‘माझे शस्त्रकर्म करण्यासाठी आलेल्या आधुनिक वैद्यांनी जन्मलेल्या बाळाची लगेचच छायाचित्रे काढली. ते म्हणाले, ‘‘हे बाळ फार वेगळेच आहे. ते किती तेजस्वी आहे !’’ ते ऐकून मला ‘हा परात्पर गुरुदेवांचा प्रसादच आहे’, या विचाराने फार कृतज्ञता वाटली.

३ इ. श्रीवत्सला इंजेक्शन देण्यापूर्वी त्याला परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करण्यास सांगणे, त्याने ते लक्षपूर्वक ऐकणे आणि इंजेक्शन दिल्यावरही न रडणे : श्रीवत्सला दीड मास पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा इंजेक्शन द्यायचे होते. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘तुम्हीच श्रीवत्सला सहन करण्याची शक्ती द्या.’ मी श्रीवत्सला सांगितले, ‘‘आता तुला डोस द्यायचा आहे. तो तुला थोडे दुखेल; पण तू परात्पर गुरुदेवांचे स्मरण कर. त्यांना प्रार्थना कर.’’ श्रीवत्स माझे बोलणे आनंदाने आणि लक्ष देऊन ऐकत होता. नंतर इंजेक्शन देतांना श्रीवत्स रडला नाही. त्यामुळे आधुनिक वैद्यांनाही आश्चर्य वाटले. ‘इंजेक्शन देतांना न रडणारे हे पहिलेच बाळ आहे’, असे ते म्हणाले. घरी आल्यानंतरही तो स्थिर आणि शांत होता. तेव्हा घरातल्यांना आणि नातेवाइकांना ‘हे बाळ वेगळेच आहे’, असे वाटले. मी त्यांना म्हणाले, ‘‘हा परात्पर गुरु डॉक्टरांचा प्रसाद आहे; म्हणूनच तो शांत आहे. मला त्याची आई होण्याचे भाग्य मिळाले आहे.’’

– सौ. स्वाती विक्रम घोडके

४. वय ३ ते ६ मास

श्री. विक्रम घोडके

४ अ. ‘श्रीवत्स सतत आनंदी असतो.

४ आ. सात्त्विकतेची ओढ : साधक भेटल्यावर तो त्यांच्याकडे पाहून पुष्कळ हसतो. तो साधक आणि समाजातील सात्त्विक व्यक्ती यांच्याकडेच जातो. जे नातेवाईक साधक नाहीत किंवा सात्त्विक नाहीत, त्यांच्याकडे तो जात नाही.

४ इ. दिवसभर कितीही थकवा आला असला, तरी श्रीवत्सला पाहिले किंवा घेतले की, सर्व थकवा दूर होऊन माझे मन आनंदी होते.

४ ई. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी त्याला प्रदर्शन आणि विक्री यांचे कक्ष दाखवल्यावर त्याने ते शांतपणे पहाणे अन् ध्यान लागल्यासारखे सर्व अनुभवणे : श्रीवत्स ६ मासांचा असतांना लातूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा होती. त्याला सभा पहायला मिळावी; म्हणून मी पत्नीला त्याला घेऊन सभास्थानी येण्यास सांगितले होते. सभेच्या ठिकाणी मी त्याला प्रदर्शन आणि विक्री यांचे कक्ष, तसेच मैदान आणि व्यासपीठ दाखवत होतो अन् त्याची माहितीही सांगत होतो. तो सर्व माहिती लक्षपूर्वक ऐकत होता आणि पहात होता. जवळपास ४५ मिनिटे मी त्याला सर्व दाखवत होतो आणि तो ध्यान लागल्यासारखे ते शांतपणे अनुभवत होता. त्याने पूर्ण सभाही ऐकली.’

– श्री. विक्रम घोडके

४ उ. ‘अन्नप्राशन विधी’ झाल्यावर त्याच्यापुढे ठेवलेल्या वस्तूंपैकी त्याने ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाला हात लावणे : ‘श्रीवत्स ६ मासांचा झाल्यावर त्याचा ‘अन्नप्राशन विधी’ केला. तेव्हा ‘तो शांत बसून सर्व ऐकत आहे’, असे वाटत होते. विधी झाल्यानंतर प्रथेनुसार त्याच्यासमोर काच, भांडे, वही आणि पेन अन् ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ, असे सर्व मांडले होते. तेव्हा त्याने इतर कोणत्याही वस्तूंकडे पाहिले नाही. त्याने केवळ ग्रंथाला हात लावला.

५. वय ७ ते ९ मास

५ अ. आई सेवा करत असतांना श्रीवत्स प्रार्थना आणि श्लोक होईपर्यंत शांत बसणे अन् श्लोक चालू असतांना त्याने आनंदाने टाळ्या वाजवणे : श्रीवत्स ७ – ८ मासांचा असतांना माझ्याकडे भ्रमणभाषवरील सेवा असायच्या. तेव्हा तो कितीही गोंधळ करत असला आणि त्याला ‘आता परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग आहे. कृष्णबाप्पाचा श्लोक म्हणायचा आहे. ‘तू कसा शांत बसतोस ?’, ते पाहूया’, असे म्हटले की, तो प्रार्थना, श्लोक आणि जयघोष होईपर्यंत शांत बसायचा अन् सर्व ऐकायचा. नंतर त्याला ते श्लोक ऐकायला इतके आवडायला लागले की, आम्ही श्लोक म्हणू लागलो की, तो लगेच हसायचा आणि आनंदाने पुष्कळ वेळ टाळ्या वाजवायचा.

५ आ. ‘गुरुविण नाही दुजा आधार…’ हे भजन फार आवडणे : श्रीवत्सला तो खात असतांना भजने लावलेली आवडतात. ‘गुरुविण नाही दुजा आधार…’ हे भजन त्याला फारच आवडते. तो कितीही रडत असला आणि हे भजन लावले की, लगेच शांत होतो.

६. वय १० ते १२ मास

६ अ. सात्त्विक वस्तूंशीच खेळणे : आमच्या घरात सात्त्विक उत्पादनांचा साठा असल्यामुळे तो कापूर, अत्तर, वाती, गो-अर्क इत्यादींशी खेळायचा. तो खेळण्यांकडे न पहाता साधकांकडील मोरपीस, दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि अत्तर-कापूर यांसमवेत खेळायचा.

६ आ. संतांप्रतीचा भाव

१. पू. भार्गवराम (सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे)) आणि पू. वामन (सनातनचे दुसरे बाल संत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे)) यांची भ्रमणभाषमधील छायाचित्रे श्रीवत्सला दाखवल्यावर तो पुष्कळ आनंदी व्हायचा अन् त्याच्या डोळ्यांत पाणी यायचे.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) यांची नावे घेत खाऊ भरवतांना त्याला आनंद होतो आणि तो नमस्काराची मुद्रा करतो.

‘असे दैवी गुण असलेल्या श्रीवत्सची आई होण्याचे भाग्य मला लाभले आणि मला त्याचे संगोपन करण्याची संधी मिळाली’, याबद्दल मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– सौ. स्वाती विक्रम घोडके

७. श्रीवत्समधील स्वभावदोष 

‘भीती वाटणे, हट्टीपणा आणि राग येणे.’ – श्री. विक्रम घोडके, बार्शी, जिल्हा सोलापूर. (एप्रिल २०२०)

  • यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक