कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतात ! – डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

दहा राज्यांत केंद्राची पहाणी पथके !

तुळजापूर – कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन केल्यास मंदिरे बंद करण्याची वेळ येणार नाही; मात्र महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतात, अशी चेतावणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तुळजापूर येथे दिली. श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला आलेल्या पवार यांनी देवीच्या दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना हे वक्तव्य केले.

ओमिक्रॉनसह मूळ कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निरीक्षणासाठी महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली आहेत.

ओमिक्रॉनच्या रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने घातलेले निर्बंध सर्व राज्यांना बंधनकारक आहेत. रुग्णसंख्येचा विचार करून दळणवळण बंदी करायची कि नाही हा अधिकार राज्य सरकारला आहे, असे भारती पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.