शासकीय अधिकारी ते पत्रकार यांचा ‘सनातन प्रभात’वर असलेला विश्वास !

४ डिसेंबर १९९९ या दिवशी सांगली-कोल्हापूर आवृत्ती म्हणून चालू झालेली दैनिक ‘सनातन प्रभात’ची आवृत्ती आज १२ जिल्ह्यांत पश्चिम महाराष्ट्र-मराठवाडा आवृत्ती म्हणून विस्तारली आहे. दैनिकाशी संबंधित वार्ताहर म्हणून सेवा करतांना समाजातील शासकीय अधिकारी, हिंदुत्वनिष्ठ, पत्रकार यांच्याशी संपर्क येतो. या सर्वांचा दैनिक ‘सनातन प्रभात’वर जो विश्वास आहे, जी श्रद्धा आहे, त्यातील काही प्रातिनिधिक उदाहरणे येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

श्री. अजय केळकर

१. सांगली ‘एस्.टी.’ आगार येथील वाहतूक नियंत्रक श्री. महेंद्रसिंह ठाकूर हे दैनिक ‘सनातन प्रभात’साठी आवर्जून बातम्या देतात. प्रवाशांसाठी नवीन चालू होणार्‍या बस, विविध योजना, कोरोनाच्या संदर्भात एस्.टी. महामंडळ करत असलेल्या विविध उपाययोजना यांची माहिती वरिष्ठांच्या सल्ल्याप्रमाणे ते नेहमी ‘सनातन प्रभात’ला नियमितपणे कळवतात. ‘एस्.टी.’ सर्वसामान्यांची असून ती टिकली पाहिजे आणि अशा ‘एस्.टी.’ची बाजू दैनिक ‘सनातन प्रभात’ नेहमी चांगल्या प्रकारे मांडते’, असा त्यांचा ‘सनातन प्रभात’वर विश्वास आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘एस.टी.’च्या संदर्भात आलेल्या वृत्तांच्या ‘लिंक’ ते स्वत:हून विभाग नियंत्रक, तसेच अन्य गट यांत आवर्जून पाठवतात.

२. कोल्हापूर येथील तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि तत्कालीन कोल्हापूर महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलेल्या लोकाभिमुख कार्याविषयी एक विशेष लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या संदर्भात विशेष ‘इमेज पोस्ट’ सिद्ध करून ती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली होती, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘ट्विटर हँडल’वरून त्याचे ‘ट्वीट’सुद्धा करण्यात आले. हे वृत्त वाचून माहिती अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले होते. ‘सनातन प्रभात’ शासकीय अधिकार्‍यांच्या चांगल्या कामांची नोंद घेते आणि त्याला प्रसिद्धी देते’, असे मत त्यांनी व्यक्त केले.

३. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्‍या वृत्तांच्या ‘लिंक’ कोल्हापूर येथील शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांसह सांगली-कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ, राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, हिंदुत्वनिष्ठ हे स्वत:हून अन्य व्हॉट्सअपच्या गटांमध्ये पाठवतात.

४. दळणवळण बंदीच्या काळात बस, गाड्या बंद असल्याने दैनिकाचे अंक येऊ शकले नाहीत. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘पीडीएफ्’ अनेक जण नियमितपणे वाचत असत. कोरोना संसर्गामुळे झालेल्या दळणवळण बंदीमुळे, तसेच महापुराच्या काळात बस, गाड्या बंद असल्याने छापील आवृत्ती प्रसिद्ध होत नव्हती; मात्र त्या कालावधीतही वाचक दैनिकाची चातकासारखी वाट पहात असत. दळणवळण बंदीच्या काळात व्हॉट्सअपच्या अनेक गटांमध्ये ‘सनातन प्रभात’ची ‘पीडीएफ्’ हवी अशी आवर्जून मागणी असे आणि अजूनही आहे.

५. निमशिरगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘वेद खिल्लार’ गोशाळेचे श्री. नितेश ओझा यांनी एका कार्यक्रमाच्या संदर्भात ‘हिंदुत्वनिष्ठांचे सर्व कार्यक्रम यांचे कायम वृत्त देणारे एकमेव दैनिक म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय, तसेच त्यांच्याकडे अजय केळकर यांच्यासारखे साधक आहेत’, असे ट्वीट केले होते.

६. वृत्ताच्या निमित्ताने पत्रकार, संपादक यांच्याशी जेव्हा संपर्क येतो, तेव्हा त्यातील काही जणांना खरोखरच दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी अप्रूप वाटते. सांगली येथील दैनिक ‘ललकार’चे संपादक श्री. सुभाष खराडे यांच्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू असून ते आणि त्यांचे वडील श्री. बापूराव खराडे हे दोघेही आवर्जून ‘सनातन प्रभात’ वाचतात. श्री. बापूराव खराडे हे दैनिक वितरणाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांची नेहमी आवर्जून चौकशी करतात.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदुत्वनिष्ठ, संत, कीर्तनकार, प्रवचनकार, तसेच समाजातील अनेक घटक यांना ‘सनातन प्रभात’ हे हक्काचे व्यासपिठ वाटते. अन्य कुणी वृत्त देणार नाही; मात्र ‘सनातन प्रभात’मध्ये वृत्त येणार याविषयी त्यांना निश्चिती वाटते. सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा दैनिकासाठी सेवा करण्याची संधी श्रीगुरुकृपेने मिळाली आणि यापुढील काळातही जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत अहर्निश सेवा घडो, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना !

– श्री. अजय केळकर, सांगली


दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित आवर्जून वाचणारे पू. संभाजीराव भिडेगुरुजी !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रतिदिन आवर्जून आणि आवडीने वाचतात. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अनेक बैठकांमध्येही ते धारकर्‍यांना नेहमी दैनिक ‘सनातन प्रभात’ घेण्याविषयी, वाचण्याविषयी आवर्जून सांगतात. ‘‘मी प्रतिदिन दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतो. हे दैनिक प्रत्येक गावात, प्रत्येक घरात चालू होणे आवश्यक आहे’’, असे गौरवोद्गार पू. भिडेगुरुजी नेहमी काढतात.