सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे साधिकांना झालेले लाभ आणि त्यांनी स्वतःमध्ये अनुभवलेले पालट !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या (प.पू. गुरुदेवांच्या) कृपेने सद्गुरु (कु.) स्वाती खाडये काही उत्तरदायी साधिकांचा नियमित व्यष्टी आढावा घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा राज्यातील काही साधक प्रतिदिन त्यांना व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांचा आढावा देतात. या सत्संगामुळे सर्व साधिकांमध्ये सकारात्मकता आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे सेवा आणि व्यष्टी साधना यांतील आनंदही अनुभवता येत आहे. यातील काही साधिकांचे प्रयत्न प.पू. गुरुदेव आणि सद्गुरु ताई यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहोत. सद्गुरु ताईंना अपेक्षित असे प्रयत्न करण्यास आम्ही अजूनही पुष्कळ अल्प पडत आहोत. ‘त्यांना अपेक्षित असे घडण्यासाठी शरणागतभावाने प्रयत्न करता येऊ देत’, अशी सद्गुरु ताईंच्या चरणी आर्ततेने प्रार्थना आहे. – आढाव्यातील सर्व साधिका

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/524489.html


सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सौ. मनीषा पाठक, पुणे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)

१. आधीची स्थिती

‘माझ्या मनात ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न पूर्ण होत नाहीत’, असे नकारात्मक विचार असायचे. कधी कधी व्यष्टी साधनेचे प्रयत्न यांत्रिक पद्धतीने पूर्ण व्हायचे. स्वयंसूचना सत्र आणि नामजप करतांना अनुसंधान अल्प असायचे. काही वेळा प्रयत्नांमध्ये चढ-उतार असायचे. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न अल्प व्हायचे. सेवेला भावाची जोड देण्याचे प्रमाण अल्प होते.

२. व्यष्टी आढावा सत्संगामुळे झालेले पालट

२ अ. आढावा सत्संगापासून सातत्याने व्यष्टी साधनेचे प्रयत्न सातत्याने आणि भावपूर्ण होणे : सद्गुरु ताई आढावा घेत असल्यामुळे मनाचा कितीही संघर्ष झाला, तरी ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न पूर्ण करूया’, असा सकारात्मक विचार मनात असतो. ‘किमान प्र्रयत्न झाले नसतील, तर आढावा देऊ शकत नाही’, अशी शिक्षापद्धत असल्याने व्यष्टी साधना पूर्ण करण्याची ओढ निर्माण झाली. आरंभी कृतीच्या स्तरावर प्रयत्न झाले. नंतर ताईंनी ‘सकाळी कुणीतरी आपली चातकासारखी वाट पहात आहे, तर आपणही त्या भावाने आढावा देऊया’, असा भाव सांगितला. तेव्हा वाटायचे, ‘मी मंदिरामध्ये जात आहे. तेथे मला गुरुदेवांचे दर्शन होणार आहे. माझ्या मनाच्या स्थितीचा आढावा आत्मनिवेदनरूपी पुष्प म्हणून त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि त्यातून मला दिवसभराचे चैतन्य मिळणार आहे.’ त्यामुळे मनापासून प्रयत्न होऊ लागले. अन्य सेवांमुळे कधी ‘व्यष्टी साधना पूर्ण नको करूया’, असे विचार आले, तर मन लगेच सतर्क होते. विचारांच्या स्तरावर स्पष्टता जाणवून ‘देवच उपाय सुचवतो’, असे वाटते. मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण अल्प झाले आहे.

२ आ. साधनेच्या नियमित प्रयत्नांमुळे आनंद अनुभवणे आणि मन अन् बुद्धी यांवरचे आवरण अल्प होऊन हलकेपणा जाणवणे : सद्गुरु स्वातीताई प्रतिदिन वेगवेगळे भाव ठेवून प्रयत्न करायला सांगत असल्यामुळे साधनेच्या प्रयत्नांना दिशा मिळून त्यानुसार आमच्याकडून प्रयत्न होतात. कधी प्रयत्न झाले नाहीत, तरी ते प्रांजळपणे सांगता येते. कधी प्रयत्नांमध्ये आनंद अनुभवला, तेही मोकळेपणाने सांगता येते. मन आणि बुद्धी यांवरचे आवरण अल्प होऊन हलकेपणा जाणवतो. पूर्वी ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न मी करत आहे’, असा कर्तेपणा होता. आता ‘व्यष्टी साधनेची सर्व संख्यात्मक सूत्रे पूर्ण करणे, हे माझ्या क्षमतेच्या पलीकडे असून हे केवळ गुरुदेवांच्या संकल्पाने होत आहे’, ही जाणीव निर्माण झाली आहे.

सौ. मनीषा पाठक

२ इ. व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत स्वभावदोष लवकर न्यून होत असल्याचे लक्षात येणे : पूर्वी काही प्रसंगांचा मनावर परिणाम व्हायचा; पण आता व्यष्टी साधना पूर्ण करणे आणि समष्टी सेवा करणे, यांमध्ये मन व्यस्त असल्याने कोणताही प्रसंग किंवा सूत्र यांविषयी विचार करायला वेळच मिळत नाही. पूर्वी एखादा स्वभावदोष न्यून करण्यासाठी पुष्कळ लढावे लागायचे. पूर्वी एखादा स्वभावदोष जात नाही, या विचारांमुळे मनाचे खच्चीकरण व्हायचे. त्यावर प्रयत्न व्हायचे; पण तो न्यून होत नसे. आता गुरुदेवांच्या कृपेने व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांना आरंभ झाल्याने ‘स्वभावदोष अल्प होत आहेत’, हे माझ्या लक्षात आले.

२ ई. तत्त्वनिष्ठ राहून साधकांचा व्यष्टी आढावा घेता येणे : माझ्याकडून ‘साधकांना मानसिक स्तरावर हाताळणे आणि भावनेच्या स्तरावर रहाणे’, असे होत असे. आता अन्य साधकांचा व्यष्टी आढावा तत्त्वनिष्ठ राहून घेता येतो. साधकांना मोकळेपणाने ‘ते कुठे अल्प पडतात ?’, हे सांगता येऊ लागले. तसेच साधकांशी मोकळेपणाने बोलल्यामुळे त्यांना साधनेची दिशा देता येते. व्यष्टी साधेच्या प्रयत्नांमुळे माझे समष्टी साधनेचे प्रयत्नही वाढले आहेत.

२ उ. अन्य साधकांचे व्यष्टी साधनेचे आढावे चालू झाल्यामुळे झालेले चांगले पालट

१. धर्मसभा किंवा अन्य उपक्रम असतांना साधकांचे व्यष्टी प्रयत्न अल्प व्हायचे. आता धर्मसभेच्या दिवशी किंवा दुसर्‍या दिवशीही सकाळी सहा वाजता साधक व्यष्टी आढावा देण्यासाठी ‘ऑनलाईन’ जोडले जातात. त्यातून जाणीव झाली की, माझे व्यष्टी साधनेचे गांभीर्य अल्प होते. त्यामुळे ते साधकांमध्ये निर्माण करण्यास मी अल्प पडत होते. ‘स्वतःपासून आरंभ केला, तरच देवाचे साहाय्य मिळते’, याची जाणीव झाली.

२. पुणे शहर आणि भोर येथील काही साधकांचा व्यष्टी आढावा लगेच चालू केला. ‘त्यांनी केंद्रातील अन्य साधकांचा आढावा घ्यायचा’, असे ठरले. असे गटसेवक ठरवून प्रतिदिन पुढील साधकांचे आढावे चालू केले आहेत. ‘ज्योतसे ज्योत जगाओ’, या उक्तीप्रमाणे सर्व साधकांचे व्यष्टी साधनेचे आढावे नियमित चालू झाले आणि मला गुरुदेवांची कृपा अनुभवता यायला लागली. व्यष्टी साधना नियमित होत असल्यामुळे काही साधकांमध्ये सकारात्मक, उपायात्मक विचार करणे आणि समष्टीतील पालट स्वीकारणे, असे पालट दिसू लागले आहेत. हे सर्व गुरुदेवांच्या कृपेने आणि सद्गुरु ताईंच्या संकल्पाने होत आहे.

‘हे गुरुदेवा, सद्गुरु ताईंच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला प्रतिदिन तुमची गुरुवाणी ऐकण्याची संधी देत आहात. ‘या गुरुवाणीतील प्रत्येक शब्द म्हणजे गुरुआज्ञाच आहे’, असा भाव मनात ठेवून ‘तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक सूत्रासाठी प्रामाणिकपणे आणि तळमळीने प्रयत्न होऊ देत’, अशी तुमच्या चरणी या तुमच्या अडाणी आणि अज्ञानी लेकराची आर्ततेने प्रार्थना आहे. ‘हे गुरुदेवा, अखंड तुम्हाला अपेक्षित असे घडण्याची धडपड या जिवाकडून होत राहू दे. ‘कितीही संघर्ष झाला, तरी या जन्मात तुमच्या चरणांशी अर्पण व्हायचे आहे, हा ध्यास तुम्ही त्या संघर्षातून अंतर्मनावर अंकित करून घ्या’, अशी तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे. गुरुमाऊलीच्या कृपेने आम्हाला मिळणार्‍या या अनमोल दैवी सत्संगाप्रती अनंत कोटी कृतज्ञ आहे.’

(१५.३.२०२०)

आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे, कोल्हापूर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

१. आधीची स्थिती

‘चालढकलपणा, सातत्य नसणे आणि सवलत घेणे या स्वभावदोषांमुळे माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प होत होते. सद्गुरु स्वातीताईंनी या गोष्टींची जाणीव करून देऊन ‘या स्थितीतून बाहेर पडून येणार्‍या आपत्काळासाठी सिद्ध व्हायचे आहे’, हे मनावर बिंबवले. आपण आनंद मिळवण्यासाठी साधना करतो, तर ‘त्यामध्ये मी कुठे अल्प पडत आहे ?’, हे शोधून ‘त्या स्वभावदोषांवर मात करायला हवी’, हे त्यांनी मला शिकवले.

डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे

२. व्यष्टी आढावा सत्संगामुळे झालेले पालट

२ अ. व्यष्टी साधनेचे लेखी नियोजन केल्यावर ‘देवच सर्व करवून घेत आहे’, याची अनुभूती येणे : अनेक दिवसांपासून मी व्यष्टी साधनेचे लेखी नियोजन करून ठेवले होते; परंतु त्याप्रमाणे कृती होत नव्हती. आता ‘प्रत्येक कृती त्या वेळेत करण्याची बुद्धी आणि शक्ती देव देत आहे’, याची मला अनुभूती येते. माझे मन मला फसवत होते. मी स्वतःभोवती एक चौकट घातली होती की, मला इतकेच जमणार आहे. आता ‘भावाची जोड देऊन प्रयत्न केल्यामुळे संघर्ष करणे शक्य होते’, असे माझ्या लक्षात आले.

२ आ. व्यष्टी साधनेची गोडी निर्माण होऊन देवावरील श्रद्धा वाढणे : या सत्संगामुळे ‘माझे साधनेचे थोडे प्रयत्न चालू झाले आहेत’, असे वाटते. आढावा देण्यासाठी काही निकष होते. तेव्हा माझ्या मनात ‘सेवा आणि वैयक्तिक गोष्टी करून व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न कसे पूर्ण होणार ?’, असा विचार आला. प्रयत्न चालू केल्यावर ‘देवच सर्व करवून घेत आहे’, याची मला प्रचीती आली. इतक्या वर्षांत जे शक्य झाले नाही, ते सद्गुरु ताईंचा आढावा चालू झाल्यानंतर २ मासांमध्ये शक्य झाले. ‘हे केवळ ईश्वरी कृपेमुळे आहे’, असे मला वाटते. आता व्यष्टी साधनेची गोडी निर्माण होत आहे. त्यामुळे माझी श्रद्धा वाढत आहे.

२ इ. ‘प्रत्येक कृती भाव ठेवून केल्यामुळे देहात चैतन्य येत आहे’, हे अनुभवता येणे : स्वयंसूचनांची सत्रे करणे, स्तोत्र ऐकणे, आवरण काढणे आदी कृती करतांना भाव ठेवून केल्याने ती अधिक गुणात्मक होत आहे. नामजप करतांना भाव ठेवल्यामुळे ‘देहामध्ये चैतन्य येत आहे’, हे अनुभवता आले. नामजपाप्रती कृतज्ञता आणि प्रेम वाढले आहे. विविध देवतांना केलेल्या प्रार्थनांमुळे देवाशी अनुसंधान ठेवण्यास साहाय्य होते. ‘देव समवेत आहे’, असा भाव ठेवल्यामुळे काही प्रसंगांमध्ये स्थिर रहाण्याचा भाग वाढला असून ताण न्यून झाला आहे. साधकांशी मोकळेपणाने बोलण्याचे प्रयत्न वाढले आहेत.

२ ई. सातत्याने होणार्‍या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमुळे अन्य साधकांच्या साधनेच्या प्रयत्नांत वाढ होऊन त्यांनाही आनंद मिळणे : सभा, कार्यशाळा, शिबिरे, बैठका अशा विविध सेवा चालू असतांना व्यष्टी साधनेमध्ये सातत्य ठेवता येते, हे केवळ देवाच्या कृपेने शक्य होत आहे. अन्य साधकांसाठीही व्यष्टी आढावा चालू झाल्यामुळे त्यांचे व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले आहे. आता सर्वांनी विविध भावप्रयोग करणे चालू केले आहे आणि त्यांना आनंद मिळत आहे.

मी अजून पुष्कळ अल्प पडत आहे. देवाला आणि सद्गुरु ताईंना अपेक्षित पालट होण्यासाठी प.पू. गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना करते. हे लिखाण देवानेच करवून घेतले, त्यासाठी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’ (१५.३.२०२०) (समाप्त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक