पंजाब, आसाम आणि बंगाल राज्यांत सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र १५ कि.मी. वरून ५० कि.मी. पर्यंत वाढवले !

  • अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रपुरवठा रोखण्याचा प्रयत्न

  • पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध

देशद्रोही कारवाया आणि आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी घेण्यात येणार्‍या निर्णयांना विरोध करणारे काँग्रेसी मुख्यमंत्री राष्ट्रघातकीच होत ! अशांमुळेच पाकिस्तानचे आतापर्यंत फावले आहे. अशा निर्णयांना विरोध करणार्‍यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबण्याचा कायदा करणे आता आवश्यक आहे ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

चंडीगड – केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब, आसाम आणि बंगाल राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र १५ कि.मी.वरून ५० कि.मी.पर्यंत वाढवले आहे. या ५० कि.मी.च्या परिघात सीमा सुरक्षा दल कोणत्याही आदेशाविना शोधमोहीम, अटक आणि जप्ती करू शकते. त्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी ट्वीट करत या निर्णयाचा विरोध केला आहे. ‘हे संघराज्यावर थेट आक्रमण आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा’, अशी मागणी मुख्यमंत्री चन्नी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. दुसरीकडे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘काश्मीरमध्ये आमचे सैनिक मारले जात आहेत. पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून पंजाबमध्ये अधिकाधिक शस्त्रे आणि अमली पदार्थ पाठवले जात असल्याचे आपण पहात आहोत. सीमा सुरक्षा दलाची वाढलेली उपस्थिती आणि शक्ती आपल्याला आणखी सशक्त करील. केंद्रीय सशस्त्र दलांना राजकारणात ओढू नका’, असे अमरिंदर सिंह यांनी म्हटले आहे.