‘कन्यादान’च योग्य !

वेदमूर्ती भूषण जोशी

गेले काही दिवस सामाजिक माध्यमातून एक विषय जोरदार चर्चेत आहे. आलिया भट नामक सिनेअभिनेत्रीने एका विज्ञापनामध्ये ‘कन्यादान करण्याऐवजी कन्यामान करा’, असा अनाहुत सल्ला हिंदूंना दिला. वरवर पहाता एखाद्याला वाटेल की, अभिनेत्री कन्येचा मान करायला सांगत आहे, यात काही चुकीचे नाही; परंतु त्या आधी ती कन्यादानाच्या ऐवजी ती हे करायला सांगत आहे, ते १०० टक्के चुकीचे आहे. ते कसे ? ते आपण व्यवस्थित पाहिले पाहिजे.

सनातन वैदिक हिंदु धर्मात काही संकल्पना मांडल्या आहेत. दान हीसुद्धा एक उदात्त संकल्पना आहे. ‘सत्पात्री व्यक्तीलाच दान दिले पाहिजे’, असा शास्त्राचा दंडक आहे. योग्य काळी आणि योग्य वेळी एखादे दायित्व योग्य व्यक्तीकडे सुपुर्द करणे, हे दानात अभिप्रेत आहे. दान हे निर्जीव वस्तूचे होते, हा एक गोड गैरसमज आहे. शास्त्रानुसार गोप्रदान, महिषीदान (म्हैस दान करणे), मेषदान (मेंढा दान करणे) अशी अनेक सजीवांची दानेही सांगितली आहेत. त्यामुळे हे सूत्र आपसूकच बाजूला होते.

कन्यादान म्हणजे काय ?

शास्त्रानुसार कौमार्य अवस्थेत कन्येचे संरक्षण आणि पालनपोषण यांचे उत्तरदायित्व पित्याचे आहे. कन्येच्या तारुण्यात हे दायित्व भर्त्याचे म्हणजे नवर्‍याचे आहे; कारण जेव्हा कन्या तरुण होते, तेव्हा वडील वृद्धत्वाकडे झुकलेले असतात आणि तरुण मुलीचे उत्तरदायित्व पतीकडे सुपुर्द केलेले असते. वृद्धापकाळात त्या कन्येचे उत्तरदायित्व तिच्या मुलांकडे असते; कारण त्या कन्येचा पतीही वृद्ध झालेला असतो, त्या वेळी तिचे दायित्व मुलांकडे सुपुर्द होते. तारुण्यात शारीरिक आणि मानसिक आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी योग्य जोडीदाराला जो (‘कुलशील’ आणि ‘सद्गुण’ अशा संपन्न मुलाला) ती कन्या संकल्पपूर्वक ‘धर्म, अर्थ, काम’ हे तीन पुरुषार्थ सिद्ध करण्याकरता देव, अग्नि, कुटुंब आणि नातेवाईक यांच्या साक्षीने अटीसह सुपुर्द करणे म्हणजे कन्यादान होय.

येथे अट म्हणजे कोणती ? तर शास्त्रानुसार धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे ४ पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यामधील धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ पत्नीच्या सहकार्याने करावेत. त्यात कोणताही अतिरेक करू नये, ही अट आहे. धर्म (व्रत वैकल्ये, कुलाचार, धर्मकृत्ये), अर्थ (द्रव्य योग्य पद्धतीने कमावणे आणि विनियोग, बचत, अन्य तरतूद), काम (सुप्रजा निर्माण करणे) या सर्व गोष्टी परस्पर सहयोगाने करण्यासाठी कन्यादान आहे.

कन्यादानाच्या वेळी करण्यात येणार्‍या संकल्पाचे शास्त्र समजून घेणे आवश्यक !

शिक्षणाकरता आपण मुलांना जेव्हा शाळेत पाठवतो, तेव्हा शिक्षकांना सांगतो, ‘आजपासून हा विद्यार्थी तुम्हाला सुपुर्द केला आहे. तुम्ही याला चांगला विद्वान आणि सदाचारी बनवा.’ तेव्हा आपण गुरुजींकडे विद्यार्थ्याचे दायित्व सुपुर्दच करतो. तसेच योग्य काळी योग्य जोडीदारास कन्येचे दायित्व देणे, यात काही गैर नाही. अनेक लोकांचा आक्षेप असतो की, कन्यादान करतांना मुलीच्या हातावर पाणी सोडतात; पण आम्ही आमच्या मुलीवर पाणी सोडणार नाही. मुळात संकल्प करतांना पाणी हे कर्मसाक्षी देवता असल्याने हातात उदक (पाणी) घेऊनच संकल्प करावा लागतो. एखादा श्रीमंत सांगेल की, संकल्पासाठी पाणीच का ? मी दूध, दही, मध, तूप हातावरून सोडून संकल्प करीन. त्यात काय ? तर याचे उत्तर आहे की, या पदार्थांनी संकल्प सोडला, तर या पदार्थांचा लेश किंवा लेप अथवा त्याचा चिकटपणा हातावर रहातो. तो त्या कर्मास बाधक ठरतो. ‘लेशरहित किंवा निर्लेप कर्म करावे’, हा शास्त्राचा दंडक आहे. त्यामुळे तिथे संकल्पाचे उदक सोडतांना शब्दशः अर्थ घेऊन गोंधळ करू नये. ‘नरपुंगव’ ही संस्कृतमध्ये एक पदवी आहे. याचा शब्दशः मराठी अर्थ ‘बैल’ असा घेतला, तर मग गोंधळ होतो. त्यामुळे संकल्पाचे शब्दशः अर्थ न काढता त्यातील अर्थपूर्णता, गांभीर्यता आणि त्यातील मर्म समजून घेणे महत्त्वाचे आहे.

कन्यामान म्हणण्यामागील खटाटोप ओळखा !

आज एक अभिनेत्री सांगते आहे किंवा कुणीतरी सांगते आहे म्हणून ऋषिमुनींना चुकीचे ठरवू नका. कन्या महत्त्वाची आहे; म्हणूनच तिचे उत्तरदायित्व घेण्यास सांगितले आहे. आज ‘कन्यादान बंद करा’ म्हणून सांगतील, मग कालांतराने विधीऐवजी ‘कबुल है, कबुल है’ (अल्पसंख्यांकांच्या विवाहामधील एक पद्धत), हेच योग्य आहे, असे सांगतील. आपण मात्र कन्यादानावरच ठाम रहा. दोन्ही बाजूच्या (वर-वधू पक्षाच्या) १२-१२ पिढ्यांचा उद्धार कन्यादानाने होतो, एवढे पुण्यकारक हे कर्म आहे. जेव्हा दोन्ही पक्षांच्या सहमतीने विवाह होतो, तेव्हा कन्यादान होते; पण परधर्मियाने मुलीला पळवून नेले, तर कन्यादान होत नसते. ‘कन्यादान नको, कन्यामान करा !’, हा द्राविडी प्राणायाम या करता नसेल कशावरून ? निकाह आणि चर्च, न्यायालयीन विवाह (कोर्ट मॅरेज) येथे कन्यादान नसते, हेच कन्येच्या मनावर अप्रत्यक्ष बिंबवण्याचा हा खटाटोप तर नसेल ना ?

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग.