(म्हणे) ‘आम्ही आतंकवादाद्वारे मिळवलेली सत्ता टिकवून दाखवू !’  

तालिबानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून फुकाचे बोल !

  • तालिबानने यापूर्वीही अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली होती; मात्र ती ५ वर्षांहून अधिक काळ टिकू शकली नाही, हा इतिहास आहे. तालिबानने हे कायमचे लक्षात ठेवले पाहिजे !
  • एका छोट्याशा देशातील आतंकवादी संघटना भारताच्या पंतप्रधानांना अशा प्रकारे सुनावते, हे संतापजनक. अशांना ताळ्यावर आणण्यासाठी भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !
तालिबानचा प्रमुख नेता शहाबुद्दीन दिलावर

नवी देहली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘आतंकवादाच्या माध्यमातून स्थापन केलेली सत्ता ही कायमस्वरूपी नसते’ हे विधान आम्ही आव्हान म्हणून स्वीकारत आहोत. आम्ही आतंकवादाच्या बळावर मिळवलेली सत्ता टिकवून ठेवू, असे वक्तव्य  तालिबानचा प्रमुख नेता शहाबुद्दीन दिलावर याने केले आहे. ‘तालिबान अफगाणिस्तानमध्ये योग्य पद्धतीने प्रशासकीय कारभार चालवत असल्याचे लवकरच भारताला दिसून येईल’, असेही दिलावर याने म्हटले. काही दिवसांपूर्वी मोदी यांनी एका कार्यक्रमामध्ये वरील प्रकारचे विधान केले होते.
दिलावर याने ‘रेडिओ पाकिस्तान’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताला चेतावणी देतांना, ‘भारताने अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये लक्ष देऊ नये. (तालिबाननेही काश्मीर प्रश्‍नात नाक खुपसू नये, हे त्याला ठणकावून सांगणे आवश्यक ! – संपादक) पाकिस्तान आमचे ‘मित्रराष्ट्र’ आहे. त्याने ३० लाखांहून अधिक अफगाणिस्तानी नागरिकांना आश्रय दिल्याविषयी मी आभारी आहे’, असे म्हटले आहे. ‘तालिबानला जगातील प्रत्येक देशासमवेत शांततापूर्ण आणि सामंजस्यावर आधारित सन्मानजनक संबंध ठेवण्याची इच्छा आहे’, असेही तो म्हणाला. (यावर कोण विश्‍वास ठेवील ? – संपादक)