(म्हणे) ‘स्वतःच्या घरात मान मिळत नसल्याने दलित धर्मांतर करतात !’ – बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी

  •  स्वतःच्या घरातून दुसर्‍याच्या घरात गेल्यावर मान मिळतो, असे कुठेही दिसून येत नाही. उलट दुसर्‍या घरात ते उपरेच ठरतात आणि त्यांना तुच्छच लेखले जाते, हेच वास्तव आहे !
  • हिंदुत्वनिष्ठ संघटना, धार्मिक संघटना, संप्रदाय आदी जातीभेद नष्ट करण्यासाठी कार्य करत आहेत; मात्र गरीब हिंदूंना आमीष दाखवण्यात येत असल्यानेच त्यांचे धर्मांतर होत आहे, हेच सत्य आहे. हे मांझी का सांगत नाहीत ?

पाटलीपुत्र (बिहार) – हिंदु धर्मात भेदभाव होणे, हेच धर्मांतराचे प्रमुख कारण आहे, असे विधान बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ‘हिंदुस्तानी आवाम मोर्चा’चे अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी केले. (हिंदु धर्मात जातीव्यवस्था नाही, त्यामुळे भेदभावाचा प्रश्‍नच येत नाही- संपादक.) धर्मशिक्षण न मिळाल्यामुळेच गेल्या वर्षी बिहारच्या गया येथे सातत्याने दलितांच्या ख्रिस्ती आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या घटना घडल्या. त्यावर ते बोलत होते.

जीतन राम मांझी यांनी मांडलेली सूत्रे

जीतन राम मांझी

१. जेव्हा स्वतःच्या घरामध्ये कुणाला मान मिळत नसेल, तर स्वाभाविक आहे की, ते लोक दुसर्‍याच्या घरी जातील. अशा वेळी कोण कुठल्या धर्मामध्ये जात आहे, ही समस्या नाही. घराच्या मालकाच्या हे लक्षात आले पाहिजे की, हे लोक शेवटी दुसर्‍या घरात का जात आहेत आणि स्वतःच्या घरात त्यांचा विकास होणार नाही का ?

२. दलितांच्या झालेल्या उपेक्षेमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याने ते धर्मांतर करत आहेत. त्यांच्यावर यासाठी कुठलाही दबाव नाही. अशीच उपेक्षा अन्यत्रही होत असेल, तर तेथेही धर्मांतर होईल. या धर्मांतरामुळे देशाला कोणताही धोका नाही. (धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर ! हिंदू एका धर्मातून दुसर्‍या धर्मात गेला, तर हिंदूंची संख्या एकने अल्प होत नाही, तर शत्रूच्या संख्येत एकने वाढ होते, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे मांझी यांनी कितीही दावा केला, तरी तो खोटाच आहे ! – संपादक)

३. एक दलित मुख्यमंत्री जेव्हा एखाद्या मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर ते मंदिर धुतले जाते, यातून काय समजायचे ? (असे घडले असेल, तर ते अयोग्य आहे. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच हिंदूंमध्ये वर्णाश्रमव्यवस्थेऐवजी जातपात निर्माण झाली. ती दूर करण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे ! – संपादक)