वटपौर्णिमा

२४ जून २०२१ या दिवशी ‘वटपौर्णिमा’ आहे. त्या निमित्ताने…

पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि ७ जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदु स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्री आणि यम यांचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले.

१. तिथी : वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात.

२. उद्देश : सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.

३. सावित्रीचे महत्त्व : भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे, तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते.

४. व्रताची देवता : वटपौर्णिमा या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.

५. व्रत करण्याची पद्धत : प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा. वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे, म्हणजे वडाच्या खोडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे. पूजेच्या शेवटी ‘अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, तसेच धनधान्य आणि कुल यांची वृद्धी होऊ दे’, अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात. या दिवशी स्त्रियांनी संपूर्ण दिवस उपवास करावा.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र’)