छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. काही जात्यंधांकडून सामाजिक संकेतस्थळांवरून प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याविषयी अपप्रचार केला जातो. यांत ‘गुढ्या उभारणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे’, असे सांगत गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण असल्याचे भासवून जाणीवपूर्वक हिंदूंची मने एकमेकांविरोधात कलुषित करण्याचा घाट घातला जातो. या पार्श्‍वभूमीवर जात्यंधांकडून गुढीपाडव्याविषयी केली जाणारी टीका आणि त्याचे खंडण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

टीका : शुभ समजला जाणारा कलश गुढीपाडव्याला उलट का लावतात ?

खंडण : गुढीवर उलट घालण्यात आलेल्या कलशाच्या काही प्रमाणात निमुळत्या झालेल्या भागातून तो ब्रह्मांडमंडलातून प्रजापति-लहरी आकृष्ट करून घेतो. या लहरी कलशात सामावून रहातात. कलश उलट घातल्यामुळे ती स्पंदने भूमंडलाकडे आणि पूजकाकडे प्रक्षेपित होतात. देवळातील कळस हासुद्धा याचप्रमाणे वरच्या दिशेने पूर्णपणे निमुळता असतो आणि तो लहरी आकृष्ट करतो.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या पद्धती आणि शास्त्र’)

टीका : शंभूराजांची हत्या करून ब्राह्मणांनीच गुढी उभारायला प्रारंभ केला !

खंडण :

१. वर्ष १६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावास्येच्या दिवशी हालहाल करून मारले. दुसर्‍या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन होता. हिंदूंनी तो साजरा करू नये, असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता. वस्तूतः हत्येचा गुढीपाडव्याच्या दिवशी उभारल्या जाणार्‍या गुढीशी काहीच संबंध नाही. प्रभु श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हापासून गुढ्या उभारणे, तोरणे लावणे, ही आपली परंपरा आहे. सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणूनही गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केल्याचे मानले जाते. खरेतर हा दिवस केवळ हिंदूंचाच नसून अखिल विश्‍वातील मानवजातीचा आहे.

२. औरंगजेबाने संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, हा सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ इतिहास असून तो संदर्भांसह उपलब्धही आहे. एकाही इतिहासकाराने ‘छत्रपती संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी मारले’, असे म्हटलेले नाही. याद्वारे क्रूरकर्मा औरंगजेबाचे पाप झाकण्याचा प्रयत्न जात्यंध का करत आहेत ? असा प्रश्‍न हिंदूंनी विचारावा.

हिंदूंनो, गुढीपाडव्याविषयी या जातीद्वेषमूलक प्रचाराला दाद लागू न देता हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडवा साजरा करून धर्माचरण करा ! तो शास्त्रशुद्धपणे साजरा करणे, हीच जात्यंधांना चपराक !

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीची एक ध्वनीचित्रफीत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर उपलब्ध असून ती bit.ly/39WzqCU या लिंकवर आहे. या लिंकमधील काही अक्षरे ‘कॅपिटल’ आहेत, याची वाचकांनी नोंद घ्यावी.