राज्यातील अन्य विमानतळांचे कामही प्रगतीपथावर !
मुंबई – अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून ३१ मार्चपासून प्रवासी सेवा चालू करण्याचे नियोजन आहे. उलवे येथे १ सहस्र १६० हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतिवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि २.६ दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरित्या पार पडली आहेत. तेथून एप्रिलमध्ये देशांतर्गत विमानसेवा चालू करण्याचे नियोजन आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खाजगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे. प्रवासी आणि मालवाहतूक क्षमतेत त्यामुळे वृद्धि होईल. विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल.
शिर्डी विमानतळाच्या १ सहस्र ३६७ कोटी रुपये किमतीच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली आहे. रत्नागिरी विमानतळाची १४७ कोटी रुपये रकमेची कामे प्रगतिपथावर आहेत. गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामे चालू आहेत. अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.