विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा !

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांना निवेदन देतांना श्री. किरण दुसे आणि श्री. प्रवीण पाटील

हुपरी (जिल्हा कोल्हापूर), ७ एप्रिल (वार्ता.) – विशाळगडावर ६४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडावरील प्राचीन मंदिरांची पडझड झालेली असून मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. याउलट गडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे. तरी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा अन् गडावरील ऐतिहासिक स्मारके, विविध नरवीरांच्या समाधी आणि मंदिरे यांचा कालमर्यादा ठेवून जिर्णोद्धार करा, या मागणीचे निवेदन विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने हुपरी येथील मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार यांना ६ एप्रिल या दिवशी देण्यात आले.

हुपरी पोलीस ठाण्यात गोपनीय विभागाचे अमोल माळी (उजवीकडून दुसरे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

याच मागणीचे निवेदन हुपरी पोलीस ठाण्यातही देण्यात आले. हे निवेदन गोपनीय विभागाचे अमोल माळी यांनी स्वीकारले.

उपस्थित मान्यवर – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे, तळंदगे येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शिवाजीराव मोठे आणि श्री. शिवाजीराव शिनगारे, पट्टणकोडोली येथील श्री. सचिन पणदे आणि श्री. निखिल कांबळे, हुपरी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. प्रवीण पाटील आणि श्री. संभाजी काटकर, छत्रपती संभाजी चौक येथील श्री. केदारनाथ मालवेकर, श्री दुर्गवेध प्रतिष्ठानचे श्री. महादेव आडावकर, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था हुपरी शहराध्यक्ष श्री. नितीन काकडे, श्री. पोपट हांडे, रेंदाळ येथील शिवतेज परिवाराचे श्री. उमेश तांबे, शिवसेना उपविभागप्रमुख श्री. उमेश शिंदे, यळगुड येथील श्री दुर्गवेध प्रतिष्ठानचे श्री. सचिन पाटील उपस्थित होते.

विशेष

विशाळगडाच्या संदर्भात असलेले निवेदन अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी धर्मप्रेमींनी पट्टणकोडोली, इंगळी, तळंदगे, रेंदाळ, यळगुड, हुपरी या गावांमध्ये जाऊन तेथे या विषयाचा प्रचार केला आणि तेथील नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या. सर्व गावांतून मिळून ५५० हून अधिक स्वाक्षर्‍या गोळा करण्यात आल्या होत्या.